रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या साधूंनी आक्षेप घेतला आहे. या ट्रेनच्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षचा हार घालण्यात आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेटर साधूंच्या वेशात लोकांना जेवण देत आहेत, तेच लोक खरकटी भांडी उचलताना दिसत आहेत.

हा त्यांचा अपमान असल्याचे साधूंचं म्हणणे आहे. ट्रेन वेटर्सनी इतर कुठल्यातरी रंगाचे कपडे घातले पाहिजेत. उज्जैनच्या साधूंनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रेल्वेच्या पुढील प्रवासाला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. संतप्त साधूंनी ट्रेन थांबवण्याचीही भाषा केली आहे.

आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी वेटर्सचा पेहराव लवकरात लवकर बदलावा, अन्यथा १२ डिसेंबरला सुटणाऱ्या पुढील ट्रेनसमोर हजारो हिंदूंच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे.

दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या या ट्रेनचा अयोध्या हा पहिला थांबा आहे. येथून धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे रस्त्याने नेपाळला नेले जाते. यानंतर प्रवाशांना रेल्वेने भगवान शिवाची नगरी काशी येथे नेले जाते. येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.