Water Leakage in Parliament: पावसाळा आला की अनेक घरांमध्ये ओल येणे किंवा पाण्याती गळतीसारखे प्रकार आता बऱ्याच घरांमध्ये सवयीचे झाले आहेत. पण प्रत्यक्ष देशाच्या संसदेमध्ये अशा प्रकारे पाणीगळती होत असेल तर? काँग्रेसचे तामिनाडूमधील खासदार मनिकम टागोर यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये यंदाच्या पावसाळ्यात देशाच्या नव्या संसदेत काय परिस्थिती उद्भवली आहे, हे दिसून येत आहे. या व्हिडीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीमध्ये चक्क पाणीगळती होत असल्याचं दिसत आहे. त्यासाठी खाली बादली ठेवून ते पाणी जमा केलं जात असल्याचं दृश्य दिसत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यासाठी संसदेत स्थगिती प्रस्ताव मांडला आहे.

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी संसदेतील पाणीगळतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करून फक्त ‘नई संसद’ अशा दोन शब्दांत पोस्ट केली आहे. काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांनी पाणीगळतीचा व्हिडीओ शेअर करून संसदेत स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. त्याशिवाय, या व्हिडीओसह त्यांनी खोचक शब्दांत पोस्टही केली आहे.

“बाहेर परीक्षेचे पेपर लीक होत आहेत. संसदेत पाणी लीक होत आहे. नव्या संसद भवनाचं काम होऊन फक्त एक वर्ष झालं आहे. त्यात स्वत: राष्ट्रपती संसदेतील ज्या मार्गाचा वापर करतात, तिथेच होणारी पाण्याची गळती म्हणजे नव्या इमारतीतील समस्यांचं द्योतकच आहे. यासाठी आम्ही आज लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहोत”, अशी पोस्ट मनिकम टागोर यांनी केली आहे.

UPSC चे विद्यार्थी दिल्लीत कसे राहतात पाहा! पोलीस उपअधीक्षांनी शेअर केला VIDEO; म्हणाल्या, “१० बाय १० च्या खोलीसाठी…”

“ही पाणीगळती इमारतीच्या डिझाईनचाच भाग आहे का?”

दरम्यान, या पाणीगळतीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी खोचक पोस्ट शेअर केली आहे. “नव्या संसदेपेक्षा तर जुनी संसद चांगली होती, जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. पुन्हा जुन्या संसदेतच जाउयात का? किमान जोपर्यंत नव्या संसदेत हा पाणीगळतीचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत तरी? जनता विचारतेय की भाजपा सरकारच्या काळात बांधलेलं प्रत्येक नवीन छत गळणं हा त्यांनी विचारपूर्वक तयार केलेल्या डिझाईनचा भाग आहे की…”, असं यादव यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मनिकम टागोर यांनी नव्या संसद भवनातील गळतीवर उपाय शोधण्यासाठी समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे. “ही समिती या पाणीगळतीच्या कारणांचा शोध घेईल, नव्या इमारतीच्या डिझाईनचा आणि त्यासाठी वापरलेल्या बांधकाम साहित्याचा आढावा घेईल आणि आवश्यक त्या उपाययोजना सुचवेल. त्याचबरोबर ही समिती नव्या इमारतीच्या देखभालीसंदर्भात निश्चित अशी नियमावली निश्चित करेल. या सर्व प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी आपल्या अभ्यासाचे निष्कर्ष ही समिती जाहीरदेखील करेल”, अशी भूमिका मनिकम टागोर यांनी मांडली आहे.