ओदिशातून हत्ती का येत आहेत?

ओदिशाच्या जंगली भागात वाढत्या मानवी हालचालींमुळे हत्ती आणि मानव असा संघर्ष सुरू झाला आहे. पर्यावरणापेक्षा ‘विकास कामां’ना प्राधान्य मिळाल्याने हत्तींचा अधिवास आणि कॉरिडॉर खंडित होत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोहखनिज आणि कोळसा खाणी सुरू झाल्यामुळे हत्तीच्या अधिवासाचे तुकडे होऊन हत्ती मानवी वस्तीत विस्थापित होत आहेत. हत्तींच्या अधिवासावर खाणकामाखेरीज जंगलतोड, रस्तेबांधणी यांमुळे परिणाम होत आहे. ओदिशातील या हत्तींनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या तीन राज्यांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे.

महाराष्ट्रात आधीपासूनच अधिवास?

प्राचीन काळापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ हा हत्तींचा मूळ अधिवास आहे. गोंड राजांच्या राजचिन्हावर हत्ती असे. तसेच इतर राज्यांच्या काळात येथील रानटी हत्तींचा युद्धात उपयोग होत असे. त्यामुळे ओदिशातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जसे हत्ती येत आहेत, तसेच ते महाराष्ट्रातील विदर्भातदेखील येतीलच, असा अभ्यासकांचा दावा आहे. महाराष्ट्रात २००-३०० वर्षांपूर्वी हत्तींचा अधिवास होता. त्यामुळे ओदिशातून विस्थापित होणारे हत्ती छत्तीसगडमार्गे इथे येत आहेत. अभ्यासकांच्या मते, आधी एक/ दोन किंवा तीन हत्ती येऊन ‘रेकी’ करतात. त्यांना तो अधिवास त्यांच्यासाठी सुरक्षित वाटला तर ते आपल्या समूहासह परत येतात. त्यामुळे याठिकाणी हत्ती येणार हे निश्चित आहे.

हत्ती पळवून लावणे हा पर्याय आहे?

ओदिशातून छत्तीसगडमार्गे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात हत्ती येत आहेत. २०२० साली गडचिरोली जिल्ह्यात दोन ते तीन हत्ती आलेत. त्यानंतर २०२० मध्ये २२-२३ हत्तींचा कळप या जिल्ह्यात आला आणि स्थिरावला. आता चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प परिसरात दोन हत्तींनी मुक्काम ठोकला आहे. जिल्ह्यात आधीच मानव-वाघ संघर्ष पेटला आहे. आता व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रातच हत्ती स्थिरावले असल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वी हत्तींमुळे निर्माण झालेल्या संघर्षात गावकऱ्यांचा बळीदेखील गेला आहे. त्यावेळी गावकऱ्यांनी फटाके फोडून, टायर जाळून हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा प्रकार अंगलट येण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी हत्ती बिथरून समोर येणाऱ्यावर हल्ला करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापन या दोन हत्तींबाबत सावध पावले उचलत आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या धर्तीवर ताडोबा प्रशासन काम करीत आहे.

‘हाथी मित्र दल’ काय आहे?

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड वनखात्याने घनदाट जंगलात, जंगलाच्या काठावर असलेल्या हत्ती आणि मानवी वस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘हाथी मित्र दल’ या त्या उपक्रमात वनखात्याच्या अधिकाऱ्यांखेरीज, स्थानिक समुदायातील नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. हे हत्तीमित्र रात्रंदिवस जागे राहून, हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. जर कोणताही हत्ती गावाजवळ आला, तर ते लोकांना सावध करतात. दिवसा जेव्हा हत्ती सहसा विश्रांती घेतात, तेव्हा हे हत्तीमित्र पायी त्यांचा मागोवा घेतात. रात्री, जेव्हा हत्ती अन्नासाठी फिरतात तेव्हा हे हत्तीमित्र वनविभागाच्या गस्ती वाहनातून या हत्तींवर लक्ष ठेवून असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यास का आवश्यक आहे?

मध्य प्रदेशातून १९३० मध्ये हत्ती नामशेष झाले, मात्र १९८६ नंतर पुन्हा याठिकाणी हत्ती आले. छत्तीसगडमध्येही हत्ती परतले आणि आता महाराष्ट्रात- विशेषत: विदर्भात- ओदिशातून छत्तीसगडमार्गे हत्ती परतले आहेत. अभ्यासकांच्या मते विदर्भातील हत्तींचा इतिहास पाहता येत्या दहा वर्षांत याठिकाणी मोठ्या संख्येने हत्ती स्थिरावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही ‘हाथी मित्र दल’ स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यात गावातील लोक, वनखात्याचे अधिकारी आणि अभ्यासकांचाही समावेश असायला हवा. हत्तींचा मागोवा घेताना गावकऱ्यांना जागृत करण्यासोबतच जी काही निरीक्षणे आढळतील त्याचा अहवाल तयार करून, त्यातून पुढच्या पाच वर्षांचा आराखडा तयार करता येईल. त्यामुळे पुढची आव्हाने पेलता येतील. हे सहजीवन राहिले तर वनसंरक्षणालाही बळकटी मिळेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.