RCB Victory Parade Bengaluru Stampede १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे विजेतेपद मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वागत करण्यासाठी बुधवारी (४ जून) लाखोंच्या संख्येत त्यांचा चाहता वर्ग बंगळुरूच्या रस्त्यावर जमला होता. मात्र, या उत्सवाला गालबोट लागले. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर गर्दी आटोक्याच्या बाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.
या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या संघाच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी ही गर्दी केली होती. या दुर्घटनेनंतर, विराट कोहलीने या घटनेविषयी दुःख व्यक्त केले. इन्स्टाग्रामवर आरसीबीनेदेखील अधिकृत विधान शेअर केले. परंतु, नक्की चूक कुठे झाली? चेंगराचेंगरी कशामुळे झाली? ११ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? प्रत्यक्षदर्शी आणि अधिकारी नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात.
नक्की काय घडले? प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
- आरसीबी संघ कर्नाटकातील बंगळुरू येथे त्यांच्या चाहत्यांसह विजय साजरा करण्यासाठी रवाना झाला.
- आरसीबी संघ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी विधान सौधा येथे गेला.
- संघ बंगळुरूमध्ये दाखल होताच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि उत्साह दिसत होता, कारण तब्बल १८ वर्षांनी आरसीबीने हा विजय मिळवला.
- सुरुवातीला संघाने घोषणा केली होती की, ते विधान सौधा ते स्टेडियमपर्यंत खुल्या बसमध्ये विजयी परेडचे आयोजन करतील आणि या परेडपूर्वी स्टेडियममध्ये एक कार्यक्रम होईल आणि त्यासाठी मर्यादित मोफत पास ऑनलाइन उपलब्ध असतील.
- याच्या काही तासांनंतरच वाहतूक पोलिसांनी विजय परेड होणार नाही, अशी घोषणा केली.
- परंतु, चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रम नियोजित वेळेप्रमाणे सुरू राहिला. त्या ठिकाणी केवळ ३२००० लोकांची क्षमता होती.

स्टेडियमच्या गेटवर गर्दी जमली होती, लोक आत जाण्याचा प्रयत्न करत होते. चंद्रशेखर राजू या प्रत्यक्षदर्शीने ‘द हिंदू’ला सांगितले, “मी आणि माझी पत्नी दुपारी २ वाजता स्टेडियमजवळ पोहोचलो आणि आम्ही गेट २० जवळ प्रतीक्षा करत होतो. दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान, जेव्हा त्यांनी लोकांना आत येण्यासाठी गेट उघडले तेव्हा गर्दीने एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोक चक्क कुंपणावरून चढून आत जात होते.” इतर प्रत्यक्षदर्शींनीदेखील अशीच भावना व्यक्त केली. इनायत नावाच्या व्यक्तीने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “सर्व जण आत आले. गोंधळात काही लोक जमिनीवर पडले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.”
वेणू नावाच्या एका कट्टर आरसीबी चाहत्याने ‘न्यूज १८’ला सांगितले, “मी गर्दीत असलेल्या लोकांमध्ये होतो. पण, काही वेळानंतर मला श्वासही घेता येत नव्हता. मी हार मानली. तिथून निघून जाणे योग्य ठरेल असे मला वाटले आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण, गर्दी इतकी होती की मी हलूही शकलो नाही. अचानक मला धक्का बसला आणि पोलिसांचा बॅरिकेड माझ्या पायावर पडला. मला फक्त असह्य वेदना जाणवत होत्या. एका पोलिसाने मला बाजूला खेचले आणि वाचवले तोपर्यंत मी थरथरत होतो.”
या चेंगराचेंगरीतून बचावलेल्या राहुल नावाच्या एका चाहत्याने सांगितले की, आम्ही तिकिटे विकणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तिकिटे बुक केली होती, पण ती डाउनलोड करता आली नाहीत, त्यामुळे आम्ही स्टेडियममध्ये जाऊन कोड स्कॅन करून आत जाण्याचा विचार केला. पण, गर्दी वाढू लागली आणि जेव्हा आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला धक्के बसले. मी अचानक जमिनीवर पडलो आणि माझ्या मानेला तीव्र वेदना होत होत्या,” असे त्याने ‘न्यूज १८’ला सांगितले.
चाहत्यांचा निष्काळजीपणा आणि पोलिसांची कारवाई
अधिकाऱ्यांच्या मते, दुपारी ४.१५ च्या सुमारास गर्दी आटोक्याच्या बाहेर जाऊ लागली. ५,००० पोलिसांची तैनाती या गर्दीसाठी पुरेशी ठरणार नाही, हे अगदी स्पष्ट झाले. स्टेडियम गर्दीने भरू लागले आणि पोलिसांनी बाहेर जमलेल्या समर्थकांना पांगवण्यासाठी विनंती केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रवेश मिळत नसल्याने काहींनी जवळच्या झाडांवर आणि स्टेडियमच्या भिंतीवर चढून आत उडी मारली.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने ‘न्यूज १८’ला सांगितले, “लोकांनी आमच्या सूचना आणि विनंतीचे पालन केले नाही. काहीही झाले तरी त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश हवा होता.” इतर प्रत्यक्षदर्शींनीही सांगितले की, चाहत्यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. संदीप प्रथमेश म्हणाले, “लोक स्टेडियमकडे धावत होते आणि बरेच जण गेटच्या दिशेने जात होते. प्रवेशद्वार लहान होते. फक्त पास किंवा तिकिटे असलेल्यांना आत प्रवेश दिला जात होता, परंतु बरेच जण तिकिटे नसतानाही मोठ्या संख्येने जमले होते.”
विजयी परेड भोवतालचा गोंधळ
एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची घटना विजयी परेडविषयीच्या परस्परविरोधी विधानांमुळे घडली असे अनेकांचे सांगणे आहे. आरसीबी संघाच्या व्यवस्थापनाने सायंकाळी ५ वाजता विजयी परेड आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगण्यात आले, “चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडनंतर उत्सव साजरा केला जाईल. आम्ही सर्व चाहत्यांना पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती करतो. shop.royalchallengers.com वर मोफत पास (मर्यादित प्रवेश) उपलब्ध आहेत,” असे त्यात सांगण्यात आले होते. परंतु, बंगळुरू पोलिसांनी यापूर्वीच सांगितले होते की, विजयी परेड होणार नाही. या परस्परविरोधी विधानांमुळे आरसीबी संघाबरोबर विजय साजरा करण्यासाठी स्टेडियमबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतेक तरुण होते, त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश होता. मृतांपैकी अनेक विद्यार्थी होते. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आश्वासनही दिले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि १५ दिवसांत अहवाल सादर करण्यासही सांगितला आहे. ते म्हणाले, “हा सामना काल संध्याकाळी (मंगळवार) झाला आणि आज हा कार्यक्रम क्रिकेट असोसिएशनने आयोजित केला होता, त्यामुळे इतके लोक येतील अशी अपेक्षा नव्हती. स्टेडियमच्या क्षमतेइतकी किंवा त्यापेक्षा काही प्रमाणात जास्त लोक येतील अशी अपेक्षा होती.”
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “तेथे लहान दरवाजे आहेत. लोक दरवाज्यांमधून आत आले. त्यांनी दरवाजेही तोडले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. इतकी गर्दी होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मी असे म्हणत नाही की काहीही झाले नाही, परंतु चौकशीतून तथ्य बाहेर येईल.” उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही कार्यक्रमस्थळी गर्दी झाल्याबद्दल माफी मागितली.