कोल्हापूर : एकीकडे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीला गती आली असताना दुसरीकडे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. यामुळे राजू शेट्टी पेचात सापडले आहेत. जयसिंगपूर परिसरातील आंदोलनातील जवळपास २०० कार्यकर्त्यांना १५ एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी पोलिसांनी सुचना केल्या आहेत. याच दिवशी मी माझ्या लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे. माझ्याबरोबर अर्ज भरायला कार्यकर्ते येऊ नयेत म्हणून सरकार रडीचा डाव खेळत आहे. माझा एकही कार्यकर्ता असल्या दबावाला बळी पडणार नसून कोणीही हजर राहणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला आहे.

साखर कारखान्यांकडून मतदारसंघात दबावतंत्र सुरू आहे. कितीही दबाव टाकला तरी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, शेतकऱ्यांची मुंडी पिरगाळून निवडणुका जिंकता येत नाहीत. या निवडणुकीत साखर कारखानदार एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांच्या उसातून काटा मारून काढलेला पैसा ते निवडणुकीत वापरणार आहेत. धनशक्ती विरूध्द जनशक्तीची ही लढाई आहे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे. एफआरपीच्या तुकड्याला तेच जबाबदार आहेत. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा : कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझी लढाई ही साखर कारखानदारांविरोधात आहे. प्रशासनाने पोलिस यंत्रणेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर दबावतंत्राचा वापर करू नये. १५ तारखेला सर्व शेतकरी माझ्या बरोबर अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. १५ एप्रिलला आमच्यातला कोणीही पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार नाही. सरकारला आणि पोलिसांना जे काही करायचे आहे ते त्यांनी खुशाल करावे. सरकारने सांगितल्याप्रमाणे आमचे १०० रूपये साखर कारखानदारांना देण्यास सांगावे. पोलिसांचा वापर करून रडीचा डाव खेळू नका. अन्यया संघर्ष अटळ असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.