जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणाऱ्या महिलांच्या ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामात चार संघ सहभागी होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी जाहीर केले.

‘‘महिला क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठी यंदा ‘बीसीसीआय’ने ट्वेन्टी-२० चॅलेंज स्पर्धेत चार संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चा सचिव जय शहा म्हणाला. चौथ्या संघाच्या नावाविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असेही शहाने सांगितले.

२०१८मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हास यांच्यात सर्वप्रथम महिलांचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. २०१९च्या हंगामात व्हेलॉसिटी या संघाची भर पडली, त्या वेळी सुपरनोव्हासने विजेतेपद मिळवले होते.