श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० राहुल त्रिपाठीला आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. राहुल त्रिपाठीला जूनमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाच्या संघात स्थान मिळाले होत, पण या खेळाडूला पदार्पणाची संधी मिळत नव्हती. अखेर ६ महिन्यांनंतर राहुल त्रिपाठीची प्रतीक्षा संपली आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर, जे या खेळाडूचे होम ग्राउंड देखील आहे, राहुल त्रिपाठीला फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्या हस्ते पदार्पण कॅप देण्यात आली.

आयपीएल २०१७ मध्ये राहुल त्रिपाठीचे नाव पहिल्यांदा झळकले होते. त्यावेळी राहुल त्रिपाठीने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंटकडून पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्रिपाठी अपयशी ठरला, पण येत्या हंगामात हा खेळाडू चमकू लागला. राहुल त्रिपाठीने २०२२ मध्ये आपल्या प्रतिभेची खरी ताकद दाखवून दिली. त्या कामगिरीच्या जोरावर या फलंदाजाने टीम इंडियात स्थान मिळवले. त्याला जखमी खेळाडू संजू सॅमसनच्या जागी संधी मिळाली.

आयपीएल २०२२ मध्ये चमकला राहुल त्रिपाठी –

सनरायझर्स हैदराबादने राहुल त्रिपाठीला आपल्या संघात संधी दिली. त्यानंतर या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली. त्रिपाठीने संपूर्ण हंगामात २० षटकारांच्या मदतीने ४१३ धावा केल्या. त्रिपाठीची सरासरी ३७.५५ होती आणि त्याचा स्ट्राईक रेटही १६० च्या आसपास होता. हे स्पष्ट आहे की त्रिपाठीच्या या कामगिरीने टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना प्रभावित केले. त्यामुळे आज हा खेळाडू टीम इंडियाचा एक भाग आहे.

त्रिपाठी वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो –

राहुल त्रिपाठी हा त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. या खेळाडूने स्थानिक क्लब सामन्यात ६ चेंडूत ६ षटकारही लगावले आहेत. त्रिपाठीचा अलीकडचा फॉर्मही अप्रतिम आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग तीन शतके झळकावली होती.

कोण आहे राहुल त्रिपाठी?

राहुल त्रिपाठी यांचा जन्म रांची (झारखंड) येथे झाला. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. ३१ वर्षीय फलंदाज २०१० पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा – MAH vs ASM: रणजी ट्रॉफीमध्ये केदार जाधवचा धुमाकूळ; आसामच्या गोलंदाजांना घाम फोडत झळकावले द्विशतक

राहुल त्रिपाठीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५२ सामन्यांत २७२८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ५३ लिस्ट-ए सामन्यात १७८२ धावा केल्या. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये १२५ सामने खेळताना त्याने २८०१ धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि श्रीलंका संघांतील दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे, तर श्रीलंका संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आहे. श्रीलंका संघाने ८.२ षटकानंतर बिनबाद ८० धावा केल्या आहेत. युझवेंद्र चहलने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने कुसल मेंडिसला ५२ धावांवर बाद केले.