RCB vs RR Eliminator Match Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. आरसीबीने सलग ६ सामने जिंकून प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले होते. तर दुसरीकडे, राजस्थानला मे महिन्यात एकही विजय मिळवता आला नाही. मात्र एलिमिनेटर सामन्यात संजू सॅमसनच्या संघाला आरसीबीचा पराभव करत विजय मिळवण्यात यश आले.

एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. प्रथम फाफ डू प्लेसिस आणि नंतर विराट कोहली बाद झाल्यानंतरही संघ सतत धावा करत होता. पण राजस्थानच्या गोलंदाजीसमोर आऱसीबीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांनी ठराविक अंतराने विकेट गमावले. आरसीबीचा संघातील मॅक्सवेल वगळता प्रत्येक खेळाडूने धावांचे योगदान दिले. आऱसीबीचा संघ जर अधिक १०-२० धावा करू शकला असता तर या सामन्यात त्यांना चांगली टक्कर देता आली असती. पण या सामन्याचा नेमका टर्निंग पॉईंट काय ठरला, जाणून घेऊया.

हेही वाचा – हार्दिक पंड्या – नताशा स्टॅनकोविक विभक्त होणार? इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल, चर्चांना उधाण

काय ठरला आरसीबीच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट?

आर अश्विन यंदाच्या हंगामात सुरूवातीला काही चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पण एलिमिनेटर सामन्यात संघाच्या विजयात त्याने
मोठी भूमिका बजावलाी. अश्विनने लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट घेत सामन्याचे रूप पालटले. आधी सेट झालेल्या कॅमेरून ग्रीनला त्याने बाद केले. त्याने कॅरम बॉल टाकला ज्यावर ग्रीनने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट रोव्हमन पॉवेलने टिपला.

पुढच्याच चेंडूवर अश्विनने आरसीबीला आणखी मोठा धक्का दिला. टी-२० मधील मोठ्या फलंदाजांपैकी एक असलेला ग्लेन मॅक्सवेल गोल्डन डक ठरला. तो येताच मॅक्सवेलने अश्विनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ध्रुव जुरेलने त्याचा सहज झेल टिपला. अशाप्रकारे आरसीबीची धावसंख्या ९७ धावांवर २ विकेट्सवरून केवळ दोन चेंडूत ९७ धावांवर ४ विकेट्स अशी झाली.

दोन चेंडूंमध्ये दोन महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतर आरसीबीने संघर्ष सुरूच ठेवला. संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १७२ धावा करता आल्या. रविचंद्रन अश्विनने ४ षटकांत १९ धावा देत २ मोठे विकेट घेतले. प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. ४५ धावांची सर्वात मोठी खेळी यशस्वीच्या बॅटमधून आली. तर रियान पराग, शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेलच्या फटकेबाजीने संघाला विजय मिळवून दिला.