R Ashwin Loses Cool on Female Umpire Video: आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, मात्र तो टी-२० लीगमध्ये खेळताना दिसत आहे. यंदा तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसला. पण तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएलनंतर आता अश्विन तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसत आहे. डिंडिगुल ड्रॅगन्स संघाकडून खेळताना रविवारी झालेल्या सामन्यात त्याच्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

आयड्रीम तिरुप्पुर तमिझान्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान अश्विनने महिला पंचांशी हुज्जत घातली. एसएनआर कॉलेज क्रिकेट ग्राउंडवर नेमकं असे काय घडलं की अश्विनला पंचांशी वाद घालावा लागला, जाणून घेऊया.

आर अश्विन हा डिंडीगुल ड्रॅगन्स संघाचा कर्णधार आहे. तो संघाकडून सलामीला उतरतो. त्याने संघाला चांगली सुरुवातही करून दिली पण जेव्हा तो १८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येपर्यंत पोहोचला तेव्हा विरोधी संघाचा कर्णधार आर साई किशोरने त्याला बाद केले. साई किशोरच्या चेंडूवर अश्विन पायचीत झाला आणि इथूनच वाद सुरू झाला. मैदानावरील असलेल्या महिला पंचांनी अश्विनला बाद घोषित करताच तो चकित झाला. त्याने महिला पंचांना सांगितले की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला आहे.

फलंदाज बाद झाल्यानंतर पंचांच्या निर्णयाशी सहमत नसतो तेव्हा काहीवेळेस पंचांशी हुज्जत घालतानाचं चित्र आपण पाहिलं. हेच चित्र या सामन्यातही पाहायला मिळालं. पण या सामन्यात महिला पंच होत्या. अश्विन त्यांच्या निर्णयावर महिला पंचांशी वाद घालताना दिसला.

अश्विनच्या वाद घालण्यामागचे कारण म्हणजे चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला होतो, मग तो एलबीडब्ल्यू कसा होऊ शकतो. या मुद्द्यावर अश्विन महिला पंचांवर ओरडताना दिसला पण त्यांनी अश्विनचं अजिबात ऐकून घेतलं नाही. यानंतर, जेव्हा अश्विनने रिप्ले पाहिला तेव्हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला होता हे खरे होते. पॅव्हेलियनमध्ये परतताना, अश्विन प्रचंड संतापला होता आणि त्याने बॅट जोरदार स्वत:च्या पायावर मारली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर. अश्विनच्या संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. संघ १६.२ षटकांत ९३ धावांतच गारद झाला. प्रत्युत्तरादाखल, विरोधी संघाने केवळ एक विकेट गमावून ११.५ षटकांत हे लक्ष्य सहज गाठले. अश्विनचीही फलंदाजांनी चांगली धुलाई केली. त्याने २ षटकांत २८ धावा दिल्या. यष्टीरक्षक तुषार राहेजाने ३९ चेंडूंत नाबाद ६५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.