/Aakash Chopra Statement On Shreyas Iyer: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आले आहे. ज्यावेळी भारतीय घोषणा करण्यात आली. त्यावेळी श्रेयस अय्यरचं नाव संघात नव्हतं. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण श्रेयसने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी केली होती. श्रेयसबाबत प्रश्न विचारला असता मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं होतं की, त्याची संघात जागा बनत नव्हती.
इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान का नाही मिळालं याचं कारण माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने सांगितलं आहे. आकाश चोप्राच्या मते, भारतीय संघातील मध्यक्रमात स्थान मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे. त्यामुळेच त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमी झाली. इंग्लंडविरुद्ध दमदार पदार्पण करणारे सरफराज खान आणि ध्रुव जुरेल अजूनही आपल्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे श्रेयसला आणखी वाट पाहावी लागेल. असं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
श्रेयस अय्यरने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपली छाप सोडली आहे. मात्र, त्याला कसोटी संघात आपलं हक्काचं स्थान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागेल. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला स्थान मिळणं कठीण होतं. कारण काही खेळाडू आहेत जे आपल्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. करुण नायरला आता संधी मिळाली आहे. सरफराज आणि ध्रुवला संधी मिळायची आहे. असं असताना श्रेयसला संधी कशी मिळेल, असं आकाश चोप्रा म्हणाला.
तसेच तो पुढे म्हणाला की, “ मला माहीत आहे त्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्याला कसोटी संघातही स्थान मिळेल, पण त्याला संयम ठेवावं लागेल.” असं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं आहे.