Perfect Time To Drink Water During a Day: उन्हाळा आलाय, शरीराला हायड्रेटेड ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, हे काही वेगळं सांगायला नकोच. साधारणपणे आपापल्या अनुभवातून प्रत्येक ऋतूमध्ये शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काय करायला हवं हे तुम्हालाही माहीत असेलच पण प्रश्न असा असतो की जे करायचंय ते करायचं कसं? म्हणजे कळतंय पण वळत नाही म्हणतात ना, अशी स्थिती तुमची आमची सगळ्यांचीच होते. आता बघा ना सगळे तज्ज्ञ सांगतात की, दिवसातुन किमान इतके ग्लास पाणी प्याच, इतक्यांदा जेवाच, इतक्यांदा फळ खाच. पण आपल्या कामाच्या गडबडीत आपल्याला या सगळ्या ‘अत्यावश्यक’ गोष्टींची यादी लक्षात राहतेच असं नाही. अशा वेळी ना वेळापत्रक तयार करणे किंवा साधारण कधी काय करायचं याचं शेड्युल बाळगणे खूप मदतीचे ठरते. आज आपण यानुसारच पाणी पिण्याच्या बेस्ट वेळा कोणत्या हे पाहणार आहोत.

झालं असं की, आहारतज्ज्ञ सिमरन वोहरा यांच्या एका पोस्टध्ये एका दिवसात पाणी पिण्याच्या ७ सर्वोत्तम वेळा सांगण्यात आल्या होत्या. सोशल मीडियावरील माहिती नेहमीच विश्वासार्ह्य असते असं नाही त्यामुळे त्याची शहानिशा करायचं आम्ही ठरवलं. यातून समोर आलेले तपशील तुम्हाला सुद्धा यंदाच्या उन्हाळ्यात सुदृढ राहण्यासाठी कामी येऊ शकतात. सर्वात आधी आपण या वेळा कोणत्या हे पाहूया आणि मग त्यावर तज्ज्ञांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया ..

1) झोपेतून उठल्यावर: अवयवांना सक्रिय करण्यासाठी
2) व्यायामानंतर: जे हृदय गती सामान्य करण्यासाठी
3) जेवण करण्यापूर्वी ३०मिनिटे: पचनासाठी
४) अंघोळ करण्यापूर्वी: रक्तदाब कमी करण्यासाठी
5) झोपण्यापूर्वी: द्रवपदार्थाची कमतरता भरून काढण्यासाठी
6) जेव्हा थकल्यासारखे वाटत असेल: पटकन शरीराला उर्जावान करण्यासाठी
7) जेव्हा तुम्ही आजारी असता: शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी

याविषयी अधिक सविस्तर माहिती डॉ प्रतीक टिबडेवाल, सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिली आहे. त्यावर सुद्धा एक नजर टाकूया..

तुम्ही झोपेतून उठल्यानंतर पाणी का प्यावे?

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमचे अंतर्गत अवयव सक्रिय होण्यास मदत होते. यामुळे झोपेदरम्यान मंदावलेले तुमचे चयापचय पुन्हा सुरू होते, शरीर हायड्रेट होते आणि विषारी घटकांचे उत्सर्जन करण्यासाठी मदत होते.

व्यायामानंतर पाणी का प्यावे?

तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातील पाणी घामाने कमी होते. डॉ. टिबडेवाल यांच्या माहितीनुसार, कसरत केल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातून गमावलेले द्रव भरून काढण्यास मदत होते, हायड्रेशनची पातळी स्थिर होते आणि तुमचे हृदय सामान्य गतीत येते. स्नायूंची पुनर्प्राप्ती व डिहायड्रेशन थांबवणे असे दुहेरी हेतू यातून साधता येतात.

जेवणापूर्वी ३० मिनिटे पाणी का प्यावे?

जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पचनास मदत होते. डॉ. तिबडेवाल यांनी स्पष्ट केले की, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पाचक एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित होऊन अन्नासाठी पोट तयार होते. शिवाय पाण्यामुळे पोट काही प्रमाणात भरलेले राहून पोर्शन कंट्रोलसाठी (प्रमाणात जेवण) मदत होऊ शकते.

आंघोळ करण्यापूर्वी पाणी का प्यावे?

अंघोळ करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. डॉ. तिबडेवाल सांगतात की, अशी मान्यता आहे की अंघोळीपूर्वी पाणी प्यायलायने ते तुमचे रक्त तात्पुरते पातळ होऊ शकते ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करणे सोपे होते. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

झोपण्यापूर्वी पाणी का प्यावे?

झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने दिवसभरातील द्रवपदार्थाची कमतरता भरून निघते. झोपेदरम्यान शरीरात अनेक क्रिया घडत असतात त्यावेळी लागणारी ऊर्जा पाण्याच्या माध्यमातून पुरवता येऊ शकते तसेच यामुळे हायड्रेशन पातळी राखण्यात मदत होते. काहींना सकाळी उठताच तोंड कोरडे पडणे किंवा डोकेदुखीचा त्रास असतो यासाठी झोपेपूर्वी किमान ग्लासभर पाणी पिणे आरामदायक ठरू शकते.

शरीर थकल्यावर पाणी प्यायल्यास..

अनेकदा डिहायड्रेशनमुळेच थकवा जाणवू शकतो. डॉ. तिबडेवाल यांनी नमूद केले की, जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तेव्हा पाणी पिणे तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यात मदत करू शकते आणि उर्जा वाढवते. थकवा टाळण्यासाठी दिवसभर हायड्रेट राहणे महत्वाचे आहे.

आजारपणात पाणीच ठरतं औषध?

तुम्ही आजारी असता तेव्हा हायड्रेशन महत्वाचे असते कारण ते तुमच्या शरीराच्या नैसर्गिक कार्यांना सुरळीत करण्यासाठी मदत करते. पाणीप्यायल्याने शरीराचे योग्य तापमान राखण्यास मदत होते एकाप्रकारे शरीराला वंगण घालण्यास, पचनास आणि पेशींमध्ये पोषक सत्व आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास सुद्धा मदत होते.

हे ही वाचा<< डायबिटीस असलेल्या अरविंद केजरीवालांना जेलमध्ये का देणार चॉकलेट-गोळ्या? मधुमेहींना कसा होतो गोडाचा फायदा?

लक्षात असू द्या!

तुम्ही आपल्या शरीराचे ऐकायला हवे. एखाद्याच्या वैयक्तिक गरजा, हालचालींची पातळी आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार पाण्याचे सेवन केले पाहिजे. फक्त हेतू एकच असावा तो म्हणजे, दिवसभर हायड्रेटेड राहणे!