पहिल्यांदाच मासिक पाळी आली आणि त्रास सहन न झाल्याने मुंबईतील मालवणी परिसरातील एका १४ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतील घडली. या घटनेमुळे मासिक पाळी हा मुली आणि स्त्रियांच्या आयुष्यातील किती महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. साधारण वयाच्या ११ ते १५ वर्षे वयादरम्यान मुलींना मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. मात्र, पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर काय करावे, होणाऱ्या वेदनांना कसे सामोरे जावे याविषयी मुलींना माहिती नसते. त्यामुळे मासिक पाळीविषयी अनेक मुलींमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. दरम्यान, मुलींना मासिक पाळीदरम्यान कोणत्या त्रासांना सामोरे जावे लागते आणि अशा वेळी पालकांची भूमिका कशी असली पाहिजे, या मुद्द्यावर ऑब्स्टट्रिशन आणि गायनेकोलॉजिस्ट डॉ. प्रज्ञा सुपे यांनी लोकसत्ता डॉट.कॉमशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

नेमकी घटना काय?

एका १४ वर्षीय तरुणीने पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर होणाऱ्या वेदना सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची घटना मालाडच्या खारोडी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. मृत मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहत होती. मात्र, मंगळवारी घरी कुणी नसताना तिने घरातील लोखंडी सळीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर शेजारच्यांनी तिला कांदिवलीतील जनकल्याणनगर येथील सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते: मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या मुलीच्या नातेवाइकांनी सांगितल्याप्रमाणे, तिला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती; ज्यामुळे तिला खूप त्रास होत होता. याच त्रासाने ती खूप हैराण होत, मानसिक तणावाखाली जगत होती. पण, ही अतिशय सामान्य समस्या असल्याचे म्हणत घरच्यांनी तिचे दुखणे गांभीर्याने घेतले नाही. अशा परिस्थितीत तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. पण, या वयात मासिक पाळीदरम्यान नेमका कोणत्या प्रकारचा त्रास होत असतो? यावेळी पालकांची भूमिका कशी असली पाहिजे? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ…

पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर कोणत्या प्रकारच्या वेदना जाणवतात?

डॉ. प्रज्ञा सुपे म्हणाल्या की, मुलींना पहिल्यांदा पाळी येते त्यावेळी पोटदुखी, ओटीपोटात दुखणे आणि अधिक रक्तस्राव होणे अशा मुख्य समस्या जाणवतात. काही वेळा खूप दिवस रक्तस्राव होत राहतो. चार ते पाच दिवसांत रक्तस्राव थांबणे अपेक्षित असते; पण काही मुलींमध्ये १० ते १२ दिवस रक्तस्राव सुरू असतो. पहिल्या दोन ते तीन दिवसांत तीव्र पोटदुखी सुरू होते.

त्यात हल्ली १६ ते १७ वर्षांच्या मुलींमध्ये पीसीओडीचा त्रास दिसून येतो. पीसीओडी म्हणजे आपल्या गर्भपिशवीच्या बाजूला अंड्यांची पिशवी असते; ज्याला ओव्हरी म्हणतात. त्यात पाण्याच्या किंवा इतर खूप गाठी तयार होतात; ज्यामुळे अनियमितपणे मासिक पाळी येते. मग अशा वेळी खूप रक्तस्राव होऊन पोटदुखीचा अधिक त्रास होतो. पण, १४ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये पीसीओडीचा त्रास होण्याचे प्रमाण फारच कमी असते.

पहिल्यांदा पाळी आल्यानंतर वेदना का होतात?

ज्या मुलींना पहिल्यांदा पाळी येते, त्यांना त्यादरम्यान तयार झालेले अंडे जे फुटायला पाहिजे, ते अनेकदा फुटत नाही. अशाने काही मुलींना मासिक पाळीदरम्यान वेदना होतात, पाळी पुढे-मागे आल्यावर जास्त दिवस रक्तस्राव होत राहतो आणि वेदना होतात. याला अनओव्हिलिटी सायकल, असे म्हणतात.

पालकांची भूमिका कशी असावी?

साधारणपणे मुलींना वयाच्या १४ ते १५ वर्षापर्यंत मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. पण, हल्ली अनेक मुलींना वयाच्या १० व्या वा १२ व्या वर्षांनंतर मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. अशा वेळी मुलींनी मासिक पाळीदरम्यान कशा प्रकारे काळजी घ्यावी? होणाऱ्या त्रासाचा कशा प्रकारे सामना करावा? स्वच्छता कशी राखावी हे समजत नाही. त्यासाठी विशेषत: आईने मुलीला लहान वयातच मासिक पाळीबद्दल माहिती करून दिली पाहिले. मासिक पाळी का येते? त्यादरम्यान शरीरात नेमके कोणते बदल होतात? मग ती प्रत्येक मुलीला येते का? या त्यांना पडलेल्या प्रश्नांविषयी योग्य ती सविस्तर माहिती करून दिली पाहिजे.

त्यातून मुलीला मानसिकरीत्या तयार केले पाहिजे की, तिला भविष्यात मासिक पाळी येणार आहे. त्यात मुलीला पहिली पाळी येण्याआधी पॅड काय असतो? तो कसा वापरायचा? किती वेळाने बदलायचा? बदलल्यानंतर त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी? याची नीट माहिती द्यायला हवी.

पहिली पाळी आल्यानंतर तिला मानसिकरीत्या आधार देणे फार गरजेचे आहे. कारण- अशा वेळी कित्येक मुलींना असह्य वेदनाही होत असतात. अनेकदा काही मुलींना वाटते की, फक्त त्यांनाच अशा प्रकारच्या वेदनांना सामोरे जावे लागतेय आणि इतर मुलींना अशा वेदना होत नाहीत. अशा वेळी आईने मुलीची समजूत घालून, तिला योग्य रीतीने समजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

केवळ आईलाच नाही, तर घरातील वडील, मुलांनाही मासिक पाळीसंदर्भात सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. कारण- अनेकदा घरात भाऊ, काका, वडील असे अनेक जण असतात; जे मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली, तर तिला ते समजून घेऊ शकतात. घरात दबक्या आवाजात बोलून हा काहीतरी वेगळा विषय आहे, असे मुलांना दाखवून देऊ नका. त्यामध्ये कोणतीही लाज बाळगण्याची गरज नाही. पालक जर या विषयावर मुक्तपणे बोलले नाहीत, तर अचानक अशा त्रासाला सामोरे जाताना मुलींना भीती वाटू लागते. मग कोणाबरोबर या गोष्टी शेअर करायच्या तेच त्यांना समजत नाही.

त्याशिवाय शाळांमध्ये मासिक पाळी या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र ठेवायला हवे. ठरावीक वयाच्या मुलींना यातून मासिक पाळीविषयीची माहिती द्यायला हवी. तसेच शिक्षकांनी याविषयी मुलींशी मुक्तपणे चर्चा करायला हवी.

मासिक पाळीदरम्यान जाणवणाऱ्या सामान्य वेदना :-

बहुतांश महिलांना मासिक पाळी येताना खूप वेदना होतात. त्यात ओटीपोटात पेटके (क्रॅम्प) येणे, पाठ, मांड्या, पाय आणि शरीरातील इतर अवयव दुखणे सुरू होते. मासिक पाळी सुरू असताना अनेक महिलांना सतत अशा प्रकारचा त्रास जाणवत असतो. मध्यम स्वरूपात जाणवणाऱ्या वेदना काही वेळा तीव्र आणि अधिक वेदनादायी असतात.

काही महिलांना डोकेदुखी, मळमळ, अतिसार, मूड स्विंग होणे आणि डोकेदुखीचा त्रास होत असतो. पण, मासिक पाळीदरम्यान जाणवणाऱ्या वेदना अनेक प्रकारच्या असतात. त्याची तीव्रता व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकते.

मासिक पाळी येताना का त्रास होतो?

मासिक पाळी येताना शरीरातील महत्त्वाचे हार्मोन्स एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन यांची पातळी कमी होते; ज्यामुळे रक्तस्राव सुरू होतो. रक्तस्राव होताना युट्रेस कॉन्ट्रेक्ट होतो. त्यामुळे कंबरदुखी, पाय दुखण्याची समस्या जाणवते.

मासिक पाळीच्या वेदना केव्हा गंभीर ठरू शकतात?

काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान जाणवणाऱ्या वेदना इतर आजारांमुळे जाणवू शकतात. त्यातीलच एक आजार म्हणजे फायब्रॉईड्स. फायब्रॉईड्स म्हणजे गर्भपिशवीला आतून किंवा बाहेरच्या बाजूने गाठी येतात. या गाठींमुळे मासिक पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो आणि तीव्र वेदना होतात. या परिस्थितीत महिलांना एका दिवसातून अनेकदा पॅड बदलावा लागतो आणि त्यामुळे त्या कामावर नीटपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
काही वेळा एन्डोमेट्रोसिसमुळेही महिलांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना जाणवतात. एन्डोमेट्रोसिस म्हणजे गर्भपिशवीतील अस्तर काही कारणांमुळे गर्भाशयाबाहेर ओटीपोटाजवळ, अंडाशय, मूत्राशय किंवा आतड्यांच्या ठिकाणी वाढते आणि तिथेही पाळीदरम्यान रक्तस्राव सुरू होतो. पण, या ठिकाणी रक्त बाहेर जाण्यासाठी जागा नसल्याने ते रक्त तिथेच जमा होते; ज्यामुळे ओटीपोटाजवळ तीव्र वेदना होऊ शकतात. पण, या प्रकारचा त्रास वयाच्या २० वर्षांनंतरच सुरू होऊ शकतो; पण वयाच्या ४० व्या वर्षी हा त्रास अधिक पटींनी वाढू शकतो.

मासिक पाळीदरम्यान वेदना होण्यामागची महत्त्वाची कारणे

१) एडिनोमायोसिस

गर्भाशयातील अस्तर जेव्हा गर्भपिशवीच्या बाहेरच्या बाजूला वाढू लागते तेव्हा त्याला एडिनोमायोसिस, असे म्हणतात. त्यातही रक्तस्राव गर्भपिशवीच्या बाहेरच्या बाजूने होतो; ज्यामुळे ओटीपोटाजवळ तीव्र वेदना होऊ शकतात.

२) तांब्यापासून बनलेले इन्ट्रायुटेरियन डिव्हाइस (IUD)

गर्भधारणा झाल्यानंतर अनेक महिला लगेच पुन्हा गर्भधारणा होऊ नये यासाठी गर्भपिशवीच्या आत इन्ट्रायुटेरियन डिव्हाइस लावून घेतात. हे डिव्हाइस लावल्यानंतर पहिले दोन ते तीन महिने महिलांना तीव्र वेदना, खूप जास्त रक्तस्राव होऊ शकतो. पण, हळूहळू शरीर त्याच्याशी जुळवून घेते तेव्हा वेदना आणि रक्तस्राव सामान्य होतो.

३) पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीज (PID)

गर्भपिशवीला त्याच्या बाजूच्या नळ्यांना किंवा अंडाशयाला कोणताही संसर्ग झाला असेल, तर त्यामुळेही तीव्र वेदना जाणवतात. फक्त मासिक पाळीदरम्यानच नाही, तर त्यानंतरही या वेदना होऊ शकतात.

४) प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS)

प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे मासिक पाळी येण्याआधी सतत मूड बदलतो, सतत खाण्याची लालसा, स्तन जड वाटू लागतात, खूप भावनिक व्हायला होते, हात-पाय-डोके दुखू लागते, शरीर थकल्यासारखे वाटते, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होते. ३० ते ४० वयोगटातील अनेक महिलांना प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमला तोंड द्यावे लागते.

५) शरीरसंबंधादरम्यान संक्रमित होणारा संसर्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा स्त्री-पुरुष शरीरसंबंध ठेवतात तेव्हादेखील महिलेला काही संसर्गजन्य आजार होऊ शकतो. जसे की, क्लायनेडिया, गोनोरिया हे संसर्गजन्य आजार. त्यामुळेही महिलेला पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीज होऊ शकतो; ज्याने मासिक पाळीदरम्यान महिलेला तीव्र वेदना जाणवतात. या वेदना केवळ मासिक पाळीदरम्यानच नाही, तर इतर वेळीही जाणवू शकतात. पण, हे सर्व आजार साधारण वयाच्या २० ते २५ वर्षांनंतर होतात.