१३२८ करोना मृत्यू लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. दोन ट्विट करुन त्यांनी ठाकरे सरकारला जाब विचारला आहे. मुंबईत ८६२ मृत्यू आणि अन्य जिल्ह्यांतील ४६६ मृत्यू आज जाहीर करण्यात आले. एकूण १३२८ मृत्यू हे अधिकचे करोना मृत्यू म्हणून जाहीर करण्यात आले.

माझी राज्य सरकारला विनंती आहे की या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता गेले तीन महिने ही आकडेवारी लपवणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कारोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याचे मान्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले.