कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ठेवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार आवश्यक असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच नावांमधील एकेरी उल्लेख टाळण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे (उदा. 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर) बाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. pic.twitter.com/4N0ClxDFwg — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2019 याव्यतिरिक्त मराठा आरक्षणादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यांच्याव्यतिरिक्त आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. “मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तर “मराठा समाजाने आरक्षणासाठी शांतीपूर्ण आंदोलन केले. त्यावेळी सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारनं दाखल केले. आता ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. एकही तरुण या गुन्ह्यांमुळे शिक्षण, नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी योग्य पाऊल उचलावे,” असं धनजंय मुंडे म्हणाले.