अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मला यासंदर्भातली मला कोणताही कल्पना नव्हती. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. अजित पवार यांच्या मुलांशी चर्चा झाली. त्यावेळी काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी अस्वस्थ आहे असं अजित पवार यांनी मुलांना सांगतिलं. त्याचमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असं मला वाटतं आहे असं  असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

“अजित पवार त्यांच्या मुलांना म्हणाले की, शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या घडामोडींना मी तोंड देतो आहे. मात्र यात काकांचं  म्हणजे माझं  नाव आल्याने  अस्वस्थ झालो.” असं अजित पवारांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

कौटुंबिक कलहातून अजित पवार यांनी राजीनामा दिला असं वृत्त काही माध्यमं चालवत आहे. मात्र त्यात काहीही तथ्य नाही. पवार कुटुंब एक आहे. त्यात कोणतेही कलह नाहीत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मी कुटुंबप्रमुख म्हणून मी अजित पवार यांची भेट घेणार आहे. त्यांच्या राजीनाम्याचं कारण मलाही जाणून घ्यायचं आहे असंही शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. सध्या इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे की आपण राजकारणात न राहिलेलं बरं. आपण शेती किंवा व्यवसाय करु. तू ही राजकारणात राहू नकोस असा सल्ला अजित पवार यांनी पार्थ पवारांना दिला असंही शरद पवार यांनी सांगितलं. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर अजित पवार तडकाफडकी निर्णय घेतात. राजीनाम्याचा निर्णयही असाच असावा असं मला वाटतं. मात्र पवार कुटुंबात कुटुंब प्रमुखाचा शब्द अंतिम असतो. मी कुटुंबप्रमुख म्हणू अजित पवारांशी चर्चा करणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला त्यांच्या राजीनाम्याचं कारण समजू शकेल असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

शिखर बँक प्रकरणात मी कुठेही सभासद किंवा संचालक नव्हतो. त्या प्रकरणात माझंही नाव ईडीकडून घेण्यात आलं याचसंदर्भात मी पुढच्या महिन्यात नसण्यासंदर्भात ईडीला माहिती दिली. तसंच पूर्वसूचनाही मी ईडीला दिली होती. मात्र ईडीकडून मला पत्र आलं की 27 तारखेला येण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जेव्हा बोलवायचं असेल तर आम्ही तुम्हाला बोलवू असं मला सांगण्यात आलं. तसंच पोलीस आयुक्तांनीही आपण ईडी कार्यालयात जाऊ नये कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

पुण्यात अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचं मला समजलं त्यामुळे मी मुंबईतून थेट पुण्यात आलो आहे. असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. गलिच्छ राजकारणामुळे अजित पवार अस्वस्थ झाले आहेत असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढे काय घडतं ते मी तुम्हाला सांगतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.