दूध दरवाढीवरुन भाजपाने राज्यभरात पुकारलेलं आंदोलन म्हणजे पुतनामावशीचं प्रेम आहे अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. भाजपाला दूध दरवाढीवरुन आंदोलन करण्याचा अधिकार नाही. भाजपाच्या काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. फक्त राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे अशीही टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

भाजपाने आज पुकारलेले आंदोलन हे पुतना मावशीचं प्रेम आहे. कारण ठोस उपाय योजना करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे. निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे. जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं म्हणत राजू शेट्टी यांनी भाजपावर टीका केली आहे. तसंच राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर ५ रुपये जमा करावे, हाच सध्याच्या घडीला महत्त्वाचा तोडगा ठरेल असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने पावलं उचलली नाहीत तर राज्यभरात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.