औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशनवर मोठा रेल्वे अपघात होता होता टळला. अमृतसरहून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसचे कपलिंग सकाळी 11.15 च्या सुमारास तुटले. ज्यामुळे या गाडीचे इंजिन डबे सोडून थोडे पुढे गेले. सुदैवाने डबे न घसरल्याने मोठा अपघात टळला. या घटनेमुळे प्रवाशी गोंधळले होते. अखेर काही वेळाने हे इंजिन मागे आणून एक्स्प्रेसच्या डब्यांना जोडण्यात आले.

या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस अचानक फलाट क्रमांक तीनला बोलावावी लागली. यामुळे प्रवाशांचाही काही प्रमाणात गोंधळ उडाला. सचखंड एक्स्प्रेस ही सुपरफास्ट गाडी आहे. या गाडीच्या इंजिनाची प्रत्येक महत्त्वाच्या थांब्यावर नियमित तपासणी होते. मनमाडहून निघताना इंजिन तपासण्यात आले नव्हते त्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे असे औरंगाबाद रेल्वे कार्यालयाने सांगितले आहे.