शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडून बसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. पण महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधिमंडळात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. अफवांवर विश्वास ठेऊ नका. चर्चा झाली नाही तर मजा येत नाही असे ते म्हणाले. १९९५ पासून कुठल्याही पक्षाला ७५ पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. हा महायुतीला मिळालेला कौल आहे असे फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा- फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री? भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी झाली निवड

गेल्या पाच वर्षात दीनदलित, गोरगरीब, मराठा समाज प्रत्येक समाजाच्या आशा, अपेक्षा आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काही बाकी राहील असेल तर ते पूर्ण करण्याची ताकत आपल्यात आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करु शकलो हे आपले यश असल्याचे फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा- उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रिपदांची भाजपाकडून शिवसेनेला ऑफर?

पुन्हा निवडून आल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. यंदा भाजपामध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी निवडून आले. हे सर्वस्पर्शी, सर्व्यवापी सरकार आहे. आपल्याला आणखी चांगलं काम करायचं आहे असे ते म्हणाले. फडणवीस यांनी यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बोलून दाखवला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचं योग्य नियोजन करुन वाहून जाणारे पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीला पाणी आणि हाताला काम देण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं. पुढे सुद्धा असचं काम चालू ठेवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.