राज्यात विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ आणि मित्रपक्ष ३८ जागांवर लढणार आहे. आता काँग्रेसची पहिली यादी २० सप्टेंबरला येईल असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज शरद पवार यांनी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचीही नावं जाहीर केली आहेत. धनंजय मुंडे परळीतून लढणार असल्याने परळीत पुन्हा एकदा बहीण विरुद्ध भाऊ असा संघर्ष पाहण्यास मिळणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले दिग्गज भाजपा आणि शिवसेनेत गेले आहेत. आता काँग्रेस कोणत्या चेहऱ्यांना संधी देणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.