Ajit Pawar at Samruddhi Expressway Final Phase Inauguration : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग आता पूर्णपणे लोकांच्या सेवेत दाखल झाला आहे. गुरुवारी (५ जून) या महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालं. या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेटमधील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा मोठा सोहळा पार पडला. तत्पूर्वी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने या बोगद्यातून प्रवास केला.

दरम्यान, या लोकार्पणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं. समृद्धी महामार्गावरील एका पूलाकडे अजित पवारांनी सर्वांचं लक्ष वेधलं. या पुलाच्या सर्व खांबांवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. मात्र, या पूलाच्या एका खांबाला रंग दिलेला नाही. हे पाहून अजित पवारांनी सर्वांना प्रश्न विचारला की त्या एका खांबालाच रंग का दिला नाही? त्यावर, कोणत्याही अधिकाऱ्याकडे उत्तर नव्हतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्थिती सांभाळली. ते आधी हसले आणि म्हणाले, “अजित पवारांचं बरोबर लक्ष असतं. एक खांब मध्ये सुटलाय”.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दोन वेगवेगळ्या कंत्राटदारांना पूलाच्या रंगरंगोटीचं काम सोपवण्यात आलं होतं. दोन्ही बाजूने त्यांचे कर्मचारी रंग मारत आले. मात्र त्या एका खांबापाशी येऊन ते थांबले असणार. या पुलाचं काम तुझ्याकडे आहे की माझ्याकडे असा प्रश्न त्यांना पडला असेल आणि त्यातून या पुलाला रंग द्यायचं राहून गेलं असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७०१ किमीचा महामार्ग लोकांच्या सेवेत दाखल

महाराष्ट्रातील या मोठ्या महामार्गाच्या (समृद्धी) शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यामुळे आता संपूर्ण ७०१ किमी लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता नागपूर ते मुंबई प्रवास १६ तासांऐवजी अवघ्या आठ तासांत पूर्ण करता येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च करून हा ७०१ किमी लांबीचा महामार्ग बांधला आहे. राज्यातील एकूण १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी शीघ्रगती महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले आणि चार टप्प्यांमध्ये त्याचे लोकार्पण पार पडले.