पंढरपूर : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रखुमाईचे २७ जूनपासून २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. तसेच गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. यातील काही सुधारणा व आवश्यक तो बदल करून सुरू ठेवणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. दरम्यान, आषाढी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी ६ जुलै रोजी आहे.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे झाली. या बैठकीस मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच पुरातत्त्व विभागाचे रामेश्वर निपाणे, सर्व खातेप्रमुख, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे उपस्थित होते.
मंदिरातील जतन संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यात्रेपूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आषाढी यात्रेत भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर राहणार असून, दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून वॉटरप्रूफ मंडप, दहा पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षा रक्षक नियुक्ती, आपत्कालीन सुविधा, चहा खिचडी वाटप, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, २४ तास अन्नछत्र, बँग स्कॅनर मशीन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम इत्यादी स्वरूपाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याबाबतची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
टोकन दर्शन प्रणालीची १५ जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार आहे. मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी कोणत्या अडीअडचणी येतात ते पाहून पुढे ही सुविधा सुरू करणार आहे. यासाठी मंदिर समिती कोणतेही शुल्क आकारणार नाही असे औसेकर महाराज यांनी सांगितले. चंदनउटी पुजेची १३ जून रोजी सांगता पूजा होणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न व मानवसेवा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.