संगमनेर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत खासदार राहुल गांधी यांनी ‘लोकसत्ता’ मध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण लेख लिहून अनेक प्रश्न विचारले आहेत. यातील प्रश्नांना निवडणूक आयोग उत्तर देऊ शकला नाही. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिलेला नसून, तो भाजपसाठी काम करतो. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांकडून ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबाबत अनेकवेळा सरकार व निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले. त्यावर आयोगाने उत्तर देणे अपेक्षित असताना, जनतेचे लक्ष वळवण्यासाठी काही मंत्री उत्तर देत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण होते. विधानसभेलाही चांगले होते. मात्र, वाढलेले मतदार, शेवटच्या तासात वाढलेला मतदानाचा टक्का आणि भाजपचा १४९ जागांपैकी १३२ जागी विजय, हे सर्व संशयास्पद आहे.
जनतेच्या मनात आजही ‘ईव्हीएम’ बाबत शंका आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले. इतके मतदार वाढले कसे ? काही ठिकाणी लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आढळते. शेवटच्या तासामध्ये ६ लाख मतदान कसे वाढले ? अशा अनेक गोष्टी शंकास्पद आहेत. याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात एका वसतिगृहात ७ हजार मतदार नोंदणी आणि त्यांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले होते. हा काय प्रकार आहे? असे प्रश्न थोरात यांनी उपस्थित केले आहेत.
अनितीचे राजकारण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेमध्ये मॅच फिक्सिंग केली असल्याची टीका करताना देशाची लोकशाही, राज्यघटना टिकली पाहिजे, यासाठी आमचा लढा सुरू राहील, असेही थोरात यांनी म्हटले आहे.