महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून दोन आठवड्यांच्या आत निवडणुका जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

मविआच्या नेत्यांनी घोटभर पाण्यात बुडून मरावं, असं त्यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही बऱ्यापैकी जिंकलो आहोत. पण त्यासाठी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं सरकार जावं लागलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळेच ओबीसी आरक्षणाची लढाई शक्य झाली आहे.”

हेही वाचा- “आधी पाप स्वीकारा, मग श्रेय घ्या” ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका

“राज्यात अद्याप उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं सरकार असतं, तर ही लढाई आम्ही जिंकू शकलो नसतो. ओबीसी समाजाला न्यायच द्यायचा नाही, असं महाविकास आघाडी सरकारनं ठरवलं होतं. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर, पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंबंधित अधिकाऱ्यांशी फडणवीसांनी चर्चाकेली, आढावा घेतला, सॉलीसीटर जनरल यांची भेट घेतली, उत्कृष्ट वकील नियुक्त केले, शिंदे फडणवीस सरकार आलं म्हणूनच ओबीसी आरक्षण लागू झालं” असंही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा- “…तर मग अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेच शिवसेनेचे अध्यक्ष” शिंदे गटाच्या युक्तीवादाचा संदर्भ देत काँग्रेसचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी सांगितलं की, “सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असतं तर त्यांनी बांठिया आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर केला नसता. तसाच दाबून ठेवला असता. परिणामी, राज्यात पुढील निवडणुका देखील ओबीसी आरक्षणाविनाच घ्याव्या लागल्या असत्या. पण शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी बांठिया आयोगाचा २७ टक्के आरक्षणाचा अहवाल स्वीकारला, तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला, उच्चस्तरीय वकील नियुक्त करून न्यायालयात आपली बाजू मांडली, म्हणून आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता घोटभर पाण्यात बुडून मरावं” असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.