BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement : भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर हे एका गावातील टीकाकारांवर बोलत असताना घसरल्याचं पाहायला मिळालं. “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले”, अशी भाषा लोणीकर बोलत होते. “तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत ते आम्हीच दिलेत.

बबनराव लोणीकर म्हणाले, “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो मोबाइल देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?

अंबादास दानवेंचा लोणीकरांवर संताप

दरम्यान, लोणीकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना (ठाकरे) आमदार अंबादास दानवे यांनी लोणीकरांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर शेअर करत लोणीकरांवरील नाराजी व्यक्त केली आहे. दानवे यांनी यासह एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, कारण… तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे आहेत. तुमची आमदारकी जनतेमुळे… तुमच्या कारमधील डिझेल जनतेमुळे… तुमचे विमानाचे तिकीटही जनतेमुळे.. तुमची नेतागिरी जनतेमुळे.. तुमचं विधानसभेतील स्थानही जनतेमुळेच आहे. निवडणूक येतेय. तुमचं वक्तव्य लक्षात ठेवू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणीकरांना कुठल्याही गावात फिरू देणार नाही : काँग्रेस

दरम्यान, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सपकाळ म्हणाले, “हे खूपच घृणास्पद वक्तव्य आहे. लोणीकरांनी किती लोणी खाल्लं, किती तूप खाल्लं, त्याचं काय-काय केलं हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. अशा पद्धतीने जनतेला, शेतकऱ्याला कोणी हिणवत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यामुळे लोणीकरांनी यासंदर्भात माफी मागावी अथवा भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित करावं. अन्यथा आम्ही त्यांना कुठल्याही गावात फिरू देणार नाही”.