पानी फाऊंडेशनला जे जमले तर सरकारला का नाही जमले असा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यासमोर पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात उपस्थित केला होता. राज ठाकरे यांच्या या प्रश्नाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले.

ते म्हणाले की, ‘मागील काही वर्षापूर्वी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ची अशी घोषणा देण्यात आली होती. त्यातून जलसंधारणाची कामे करण्याची अपेक्षा होती. मात्र, गावागावात एवढं गट-तट, धर्म-जात यामुळे ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ त्याचे असे झाले आहे. गावातील या कुरघोड्यांमुळे गावाचा विकास रखडला आहे.’ लोकचळवळीशिवाय जलसंधारणाचे काम होऊ शकत नाही. परंतु गावागावांतील गट-तट, जात-पात आणि पक्षांमुळे लोकचळवळ उभी राहत नाही. हीच गोष्ट पानी फाऊंडेशन ने हेरली. आणि त्यावर काम केले. तसेच पाणी प्रश्नाचे उत्तर लोकचळवळीत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

महाराजांचे सैन्य हे अठरा पगड जातीचं सैन्य होतं. त्यांनी सर्वांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. अमिर खान यांनी सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत केलं. गावातल्या लहान असलेल्या माणसांनी मोठं काम करून परिवर्तन केलं आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिलं आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेलं. पूर्वी जलसंधारण म्हणजे नदी नाले केवळ खोल केले जायचे. परंतु पानी फाऊंडेशन ने शास्त्रीय पद्धतीने हे काम केले. वॉटर कप मध्ये आम्ही राजकारण आणणार नाही, पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खानला केली.

पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता अमीर खान, किरण राव, अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री शिवतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

वॉटर कप स्पर्धा 2018 ची विजेते गावे आहेत –

प्रथम क्रमांक – टाकेवाडी (आंधळी) ता. माण, जी सातारा 75 लाख आणि ट्रॉफी

द्वितीय क्रमांक – भांडवली, (ता.माण, जी. सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जी. बुलढाणा) प्रत्येकी 25 लाख आणि ट्रॉफी

तृतीय क्रमांक – आनंदवाडी (ता.आष्टी) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर) प्रत्येकी 10 लाख आणि ट्रॉफी