एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे अमली पदार्थाविरोधात कारवाई करून चर्चेत आले होते. सिनेअभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ रोजी अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केल्यापासून समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत होते. आता ईडीने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवर याची माहिती दिली. कार्डेलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर याआधी झालेला आहे.

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मागच्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्याआधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाईल, अशी माहिती मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ईडीच्या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआयकडून कारवाई न होण्याबाबत याअगोदरच उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिलेला आहे.

सीबीआयने ११ मे २०२३ रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे, विश्व विजय सिंह, गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन आणि दोन बाहेरील व्यक्ती किरण गोसावी आणि सॅनविले डिसुजा यांच्यावर शाहरुख खानकडून २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खान याची सुटका करण्यासाठी ही लाच मागितली गेली असा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये ठेवण्यात आला होता.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात समीर वानखेडे यांची याआधीच चौकशी केलेली आहे. भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले होते. काही एनसीबी अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर खोटा आळ टाकला जात आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला.

३ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन खान याला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती कार्डेलिया क्रूझवर धाड टाकल्यानंतर ही कारवाई झाली होती. त्यानंतर एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाने २७ मे २०२३ रोजी आर्यन खानला या प्रकरणात क्लीन चीट दिली. वानखेडे यांनी केलेले आरोप चुकीचे असून आर्यन खानचा अमली पदार्थाच्या विक्री रॅकेटमध्ये कोणताही सहभाग नसल्याचा निर्वाळा विशेष चौकशी पथकाने दिला होता.

एनसीबीच्या अंतर्गत चौकशी अहवालात नमूद केले की, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांची नावे शेवटच्या क्षणी एनसीबीच्या वतीने घेतले होते. तसेच एनसीबीने कार्डेलिया क्रूझवरून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे फोन आणि त्यांचे जबाब नोंदविताना वानखेडे यांच्या पथकाने प्रक्रियेचे पालन केले नाही, असाही आरोप विशेष चौकशी पथकाने केला होता.