हिंगोली: निसर्गाची अवकृपा व सोयाबीनला दर नसल्याने हिंगोली जिल्ह्यात हळद पिकाच्या लागवडीचा कल वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हळदीचे १४ हजार हेक्टर क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. वसमत येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राने १२०० क्विंटल बेणे तयार केले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हे बेणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

वसमत येथे ‘बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रा’ची स्थापना झाल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून २०२४ मध्ये विविध वाणाचे ३८० क्विंटल बेणे तयार करण्यात आले आहे. पैकी २०० क्विंटलपेक्षा अधिक बेणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. तसेच ४५ हजार दर्जेदार रोपेही उपलब्ध करून देण्यात आल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले. परिणाामी नगदी पीक म्हणून सोयाबीनऐवजी हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे २ लाख ८० हजार हेक्टरवर सोयाबीन, तूर, हळद, कापूस यासह इतरही पिकांची लागवड करण्यात आली. दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी २ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पेऱ्यामध्ये घट होईल, असे सांगण्यात येते. २०२१ मध्ये सोयाबीनला ३६५० रुपये भाव होता. २०२४ मध्ये ४८९२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. २०२१ मध्ये हळदीचा भाव चार हजार ९६५ रुपये भाव होता. २०२४ मध्ये हळदीचा भाव १३३४८ रुपयांपर्यंत वाढला. परिणामी हळद लागवडीचा कल वाढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी अजय बियाणी यांनी गेल्या वर्षी साडेआठ एकरात हळदीची लागवड केली होती. त्यांना १९५ क्विंटल हळद झाली. या वर्षी ते १४ एकरांत हळदीची लागवड करणार आहेत. सोयाबीनपेक्षा हळदच परवडते, असे बियाणी म्हणाले.