राज्यात आज दिवसभरात १ हजार ३७० रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार २०१ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर ३२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. कारण, दररोज आढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. शिवाय, मुंबई, पुणे या सारख्या शहरांमध्ये तर दिवसभरात एकही नवीन करोनाबाधित आढळून न आल्याचेही समोर आलेले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३८,३९५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४८ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०५,०५१ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४००६० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२०,८०,२०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०५,०५१(१०.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७६,१९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २२,९८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.