कराड : प्रत्येकाने आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, या विचारानेच वाटचाल करावी. भारतापेक्षा इतर देश संपन्न असण्याची अनेक अंग आहेत, ती समजून घ्यावीत. सामाजिक सेवा कार्यातील मंडळींनी आपल्या देशाचा लौकिक वाढविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के यांनी केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ३०३ व्या क्रमांकाने यश मिळवल्याबद्दल अंकिता पाटील हिचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी डॉ. मस्के बोलत होते. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर होते. पुण्याच्या सिंहगड शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ज्ञानदेव मस्के म्हणाले, अंकिता पाटीलने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेले मोठे यश हे जिद्द, चिकाटी व संयमामुळे शक्य झाले. तिचा मॅरेथॉनसारखा परंतु, खडतर प्रवास इतरांना प्रेरक आहे.

डॉ. पराग काळकर म्हणाले, अंकिता पाटीलने सातत्य, संयम कायम ठेवून अभ्यास केला. मनाचा दृढपणा असल्याने तिला हे यश मिळाले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या परिघात राहून स्वतःच्या क्षमतांचा विचार केला पाहिजे. आयुष्यात योग्यवेळी योग्य गोष्टींना प्राधान्य द्यावे. प्रकाश पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात बुद्धिमत्ता, कष्ट, चिकाटी व संयम असल्यास आर्थिक पाठबळाची गरज भासत नसल्याचे ठामपणे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाली, कोणत्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी व मेहनत घेतल्यास यशाचे शिखर आपण गाठू शकतो. अपयश हे नेहमी आपल्या पदरी येते. परंतु, तेथे न थांबता पुढे जात राहिले पाहिजे.