अहिल्यानगर : जिल्ह्यात विशेषत: उत्तर भागात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. दक्षिण भागात मात्र अतिवृष्टीने जमीनी अद्याप उपळलेल्या आहेत. आत्तापर्यंत एकूण १ लाख २३९ हेक्टर क्षेत्रावर (२४.४६ टक्के) खरिप पिकांची पेरणी झाली आहे.

मे महिन्यातच जिल्ह्याभर अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले. मान्सूनपूर्व पावसाने बहुतांश जिल्ह्याला झोडपून काढले. मात्र अतिवृष्टीचे प्रमाण उत्तरेपेक्षा दक्षिण भागात अधिक होते. काही दिवसांच्या खंडानंतर आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पुन्हा पाऊस सुरू आहे. गेल्या १३ दिवसात ४६.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात अद्यापि खरीप हंगामातील पेरणीच्या दृष्टीने पूर्वमशागतीचे कामे सुरू आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे काही गावातील शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करणे अवघड झाले आहे. दक्षिण भागातील नगर तालुक्यासह पारनेर, श्रीगोंदे, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या भागात ढगफुटीसदृश्य पावसाने अजूनही शेतजमिनीत पाणी आहे. त्यामुळे तेथील पेरण्या लांबल्या आहेत.

तर उत्तर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी या भागात दक्षिणेच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने तेथे पेरण्यांना सुरू झाली आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात ६ लाख ९३ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत १ लाख २३९ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरणी झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोल्यात भाताच्या रोपवाटिका ४९० हेक्टर क्षेत्रावर तयार करण्यात आल्या आहेत. भात पिकाचे १८ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. त्यापैकी १ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. बाजरीचे ९८ हजार ५२९ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठरवले गेले आहे, त्यापैकी ८२५१.२० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. मक्याच्या ६६ हजार ११ पैकी ८५४२.५ हेक्टरवर, तुरीचे ५४ हजार ३४७ हेक्टरपैकी १० हजार ७२६ हेक्टर, मूग ५३ हजार ६०५ पैकी १४ हजार ९६३, उडीद ५४ हजार ३३७ पैकी २५ हजार २१ हेक्टर, सोयाबीन १ लाख ७८ हजार ५३८ पैकी १९ हजार ६२७ हेक्टर तर कापूस १ लाख ५६ हजार ७९४ पैकी १२ हजार ९२६ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली.