नांदेड : गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. घडाने वाकलेले केळीची झाडे अक्षरश: आडवी झाली आहेत. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत केळीचे भाव निम्म्याने घसरले. निर्यातक्षम केळी मात्र, आजही २ हजार रुपये क्विंटल या दराने प्रवास करत आहे.

नांदेड जिल्ह्यात तालुक्यासह अर्धापूर, मुदखेड, हदगाव, उमरी व अन्य काही भागांत केळीचे मोठ्य़ा प्रमाणात लागवड केली जाते. येथील केळी जळगावनंतर प्रसिद्ध असून, अफगाणिस्तान व इराण, ओमान तसेच अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते. निर्यातक्षम माल आजही २ हजार ते बावीसशे रुपये प्रतिक्विंटल भावाने जात आहे. परंतु, स्थानिक बाजारपेठेत केळीचे भाव घसरले आहेत.

मागील आठवड्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठ्याची साखळी बिघडली. झाडे घडासह पडल्याने अर्धवट लगडलेला माल बाजारात आणावा लागला. त्यामुळे केळीचे भाव ठोक बाजारात मोठे घटले. १५ दिवसांपूर्वी २ हजारांच्या पुढे असलेला भाव आता एक हजार २०० ते एक हजार ४०० रुपये प्रती क्विंटल या स्तरावर येवून पोहोचला. यामुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाले. पुढील आठवड्यापर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्र्यांचे आश्वासन

वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.