राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावरून आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे.” असं राणे यांनी म्हटलं आहे. तर, एसटी संपावार तोडगा काढण्यासाठी केंद्राने मार्ग काढावा असंही राणे म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलताना केंद्रीयमंत्री राणे म्हणाले, “शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाहीत. ते निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का की कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या.”

ST workers Strike : “ …तर आम्ही सरकारसोबत चर्चेसाठी तयार ” ; एसटी कर्मचाऱ्यांकडून पत्रकारपरिषदेत भूमिका स्पष्ट!

तसेच, “केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकाला निर्देश द्यावेत की हा प्रश्न त्वरीत मिटवा किंवा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ. जो मार्ग अवलंबवायचा त्याबद्दल मी स्वत: पंतप्रधान मोदींशी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल आणि यातून मार्ग लवकरच काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना यातून वाचवावं एवढं मी सांगेन. राज्यामध्ये जे कोण परिवहनमंत्री आहेत, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी देखील बोलेन.” असंही यावेळी राणे यांनी सांगितलं.

ST workers Strike : शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली ; विलीनीकरणाबाबत देखील झाली चर्चा!

राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात जवळपास चार तास बैठक चालली. या बैठकीस परिवनहन मंडळाचे अधिकारी देखील उपस्थितीत होते. बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेची देखील माहिती दिली. मात्र, अद्यापही ठोस असा काही निर्णय झाला नसल्याचं दिसून आलं. यावरून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवर टीका केल्याचं दिसत आहे.