सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी तीन दिवसांपासून सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाचा हिंसक वळण मिळालंय. या आंदोलनाची प्रशासनाकडुन दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शुक्रवारी त्यांनी रास्ता रोको, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्यानंतर रात्री अज्ञातांनी बुलढाणा तहसीलदार कार्यालयात उभ्या असणाऱ्या बुलडाणा तहसीलदारांच्या वाहनाला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र समयसूचकतेने वेळीच वाहनाला लागलेली आग विजवण्यात आली. या प्रकरणी तहसील विभागाकडून वाहन पेटविण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आले आहे.

नागपूर येथील संविधान चौकात १७ नोव्हेंबरच्या सकाळपासून तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी संघटनेचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. रविकांत तुपकर यांनी तिसऱ्या दिवशीही आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलं आहे. १८ नोव्हेंबरला तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गावं बंद आंदोलन केले. तसेच शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला.

रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची शासन स्तरावर कोणतीही दखल न घेतल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफीक, शेख करीम यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलन मंडपासमोरच स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना वेळीच रोखण्यात आलं. त्यांना नंतर उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रात्रीच बुलडाणा तहसीलदारांनी वाहनही पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोयाबीनला प्रती क्विंटल दर आठ हजार रुपये व कापसाचा दर प्रति क्विंंटल १२ हजार रुपये स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, पाम तेलावरचा आयात कर पूर्वी प्रमाणे ३०% करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला जीएसटी हटवण्यात यावा, छोट्या व्यापाऱ्यांवरील स्टॉक लिमिट उठण्यात यावे, कापणी पश्चात नुकसानीच्या संदर्भातले तारखेचे घोळ न घालता महाराष्ट्राच्या कृषी खात्यानुसार विम्याची रक्कम मंजूर करावी आणि राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार रुपये मदत तात्काळ द्यावी तसेच कृषीपंपाचे वीज कनेक्शन कापणे थांबवावे, या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.