केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार २.० चा अखेरचा आणि सीतारमण यांचा पाचवा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात देशाच्या विकासासाठी निर्मला सीतारमण यांनी सात प्राथमिकता सांगितल्या आहेत. त्याला ‘सप्तर्षी’ असं नाव दिलं आहे. याच ‘सप्तर्षी’वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांचा दाखला देत टोला लगावला आहे.

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी, याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही ‘सप्तर्षी’ वापरताना घेतला असावा. पण, अजित पवारांनी ठोस तरतुदी केल्या, तशा ‘सप्तर्षी’मध्ये दिसत नाहीत.”

हेही वाचा : केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“केवळ करपात्र उत्पन्नात सवलत व भांडवली खर्चात वाढ, याच जमेच्या बाजू दिसतात. परंतु, गत सात वर्षांप्रमाणे केवळ तरतूद करून चालणार नाही. तर, प्रत्यक्ष भांडवली खर्चही करायला हवा. तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल. करसवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढण्याठीही प्रयत्न करण्याची गरज होती,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

नक्की पाहा >> Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

“भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला युवा वर्ग, बळीराजा, कामगार, असंघटित क्षेत्र यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नाही. पुढच्या वर्षी निवडणुका असूनही यंदाच्या अर्थसंकल्पात गतवर्षीप्रमाणे लोकप्रिय घोषणा झाल्या नाहीत. याचाच अर्थ सरकारला देशाच्या आर्थिक वास्तवाची जाण झालेली दिसते,” असेही रोहित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली”, विनायक राऊतांचं टीकास्त्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे ‘सप्तर्षी’?

‘सप्तर्षी’ म्हणजे सात ऋषी. वेद आणि इतर हिंदू ग्रंथामध्ये ‘सप्तर्षीं’चा उल्लेख अनेकवेळा झालेला आहे. त्यानुसार, समावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा विकास करणे, हरित विकास, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र या सात प्राथमिकतेच्या माध्यमातून सरकार विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला ‘सप्तर्षी’ असं नाव देण्यात आलं आहे.