पंढरपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावर बंदी घातली आहे. तसेच मंदिरातील कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना ओळखपत्र देण्याच्या सूचना केल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. पहलगाम घटनेनंतर पोलीस प्रशासनाने मंदिरातील सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मंदिरात मोबाईल व कॅमेरा यंत्रणा असलेल्या वस्तूंसह प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिरातील सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी समितीने दिलेले ओळखपत्र परिधान करण्याचे सक्तीचे केले आहे, अन्यथा कारवाईचा इशारा समितीने दिला आहे. कर्मचारी यांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर पडण्यासाठी फक्त ‘व्हिआयपी गेट’चा वापर करण्यात येणार असल्याचे श्रोत्री यांनी सांगितले.
येथील श्री विठ्ठल मंदिरास अतिरेकी कारवाईचा धोका लक्षात घेता २५ वर्षांपासून २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक यांच्या मार्फत मंदिराची सुरक्षितता केली जाते. या शिवाय मंदिर समितीच्या वतीने अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी केली जाते. तसेच खासगी सुरक्षा यंत्रणा देखील कार्यरत आहेत. दरम्यान, मंदिरात भाविकांसह कर्मचाऱ्यांना मोबाईल बंदी सक्तीची करावी, अशी मागणी होत आहे. मंदिरातील काही कर्मचारी मोबाईलचा वापर करत असल्याच्या तक्रारी भाविकांच्या आहेत. तसेच मंदिर समितीने कर्मचारी यांना गणवेश ठरवून दिला आहे. मात्र, अनेक कर्मचारी गणवेश, ओळखपत्र याचा वापर करत नाहीत. आता या पार्श्वभूमीवर समिती अशांविरोधात कडक भूमिका घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. असे असले तरी अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती सतर्क झाली आहे.