Shivsena Shinde MLA Sanjay Gaikwad on Raj and Uddhav Thackeray : शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमधील मराठीच्या मुद्यावरील साद-प्रतिसादानंतर आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. “राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असेल”, असं त्यांनी म्हटलं आहे. पाठोपाठ, “उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही १०० पावलं पुढे टाकू”, असे वक्तव्य मनसे नेत्यांनी केलं आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या संभाव्य युतीबाबत वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
एका बाजूला राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (शिंदे) देखील मनसेबरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मुंबईतील मराठी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट राज ठाकरे यांना आपल्या बाजूला वळवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राज व उद्धव ठाकरे यांच्यतील युतीच्या चर्चेवर शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला उशीर झाला आहे”
आमदार संजय गायकवाड यांनी राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला आता खूप उशीर झाला आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे भाऊ १५ वर्षांआधी एकत्र आले असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडून देत केलेल्या विचित्र आघाडीमुळे त्यांचा जनाधार संपला आहे”.
राज व उद्धव ठाकरे एकत्र यावे : अंबादास दानवे
दरम्यान, “उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले तर या गोष्टीचा आम्हाला आनंदच होईल. दोन्ही भाऊ एकत्र येण्याची आमचीही इच्छा आहे”, असं वक्तव्य शिवसेना (ठाकरे) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे.