सातारा : वाचन संस्कृती तुटत चालली आहे, असा कंठशोष संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे. मात्र, साताऱ्यात मागील अडीच दशकापासून साहित्य सत्संग सुरू आहे. ग्रंथ महोत्सवाचे हक्काचे प्रेक्षक ठरलेले असतात. मात्र, लोकजागर केल्याशिवाय लोक साहित्य संमेलनाला येत नाहीत. शतकी संमेलनासाठी साताऱ्याचे संमेलन निश्चित पथदर्शक ठरेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, प्राचार्य सुनील कुमार लवटे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा व मावळा फाउंडेशन यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, रवींद्र बेडकीहाळ, किशोर बेडकीहाळ, डॉ राजेंद्र माने, शिरीष चिटणीस, नंदकुमार सावंत, चंद्रकांत बेबले आदी यावेळी उपस्थित होते.

लवटे म्हणाले, साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव रौप्य महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे येथील शब्दसत्संग सातत्याने सुरू आहे. साहित्य संमेलने ही सातारकरांना नवीन नाहीत. एकीकडे साहित्याची नाळ तुटत चालली आहे, असा कंठशोष इतर जिल्हे करत आहेत. मात्र, सातारा साहित्य सत्संगामध्ये रमला आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी बोधचिन्ह अत्यंत चातुर्याने बनवले आहे. तलवारीच्या दुसऱ्या टोकाला त्यांनी पेनाची रचना केली आहे.

सातारकरांवर भविष्यात अक्षर दुष्काळ पडणार नाही, याची जबाबदारी पेलण्याची वेळ आहे. पुढील शंभरव्या साहित्य संमेलनासाठी साताऱ्याचे हे साहित्य संमेलन पथदर्शी ठरावे. केवळ गर्दी जमवून चालणार नाही तर तरुण इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आणावे लागेल. त्याकरता पुढील शंभर दिवसांत सातत्याने लोकजागर करावा लागेल. साताऱ्याचे साहित्य संमेलन हे पुढील अनेक भविष्यकालीन संमेलनासाठी निश्चित पथदर्शी ठरेल, या पद्धतीने मांडणी होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा लवटे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, साहित्य संमेलन ही सातारकरांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्याने केलेल्या चळवळी या राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, सातारकर साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडतील, अशी मला खात्री आहे. सातारकर एकदा जबाबदारी घेतल्यावर मागे पुन्हा हटत नाहीत. संमेलनाच्या गर्दीमध्ये दर्दी निश्चितच दिसतील, असा आम्हाला विश्वास आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले भौतिक प्रगती म्हणजे विकास नाही, भाषा संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला संक्रमित होणे म्हणजेच साहित्य चळवळीचा वारसा समृद्ध करणे आहे.

प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले. रवींद्र बेडकीहाळ यांनी संमेलनाच्या आयोजनासाठी एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलकर्णी यांना सुपूर्द केला. सहवास मंडळाच्या ज्येष्ठ महिलांनी दहा हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह संमेलनाच्या इतिहासात प्रथमच एका शतकाहून अधिक वय असलेल्या (वयाची शंभरी पार केलेल्या) चित्रकाराने बोधचिन्ह तयार केले आहे. व्यंगचित्रकार शि. द. फडणवीस यांनी अत्यंत सुरेख व चातुर्याने तयार केले आहे. तलवारीच्या दुसऱ्या टोकाला त्यांनी पेनाची रचना केल्याने ते आकर्षक दिसत आहे.

साताऱ्यात आज मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार

साताऱ्यात १ ते ४ जानेवारी दरम्यान साहित्य संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. निवडीबद्दल सातारकरांच्या वतीने श्री.पाटील यांचा जाहीर सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते उद्या (सोमवारी) रोजी सकाळी ११.३० वाजता शाहू कलामंदिर येथे करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे.

डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, भगवान वैराट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.