कराड : मजबूत सरकारसमोरस सक्षम विरोधक असणे महत्वाचे आहे. असे असले तर लोकशाही चांगल्याप्रकारे टिकू शकते, असे मत व्यक्त करताना, राजकारणात विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कार्यरत रहायला हवे, अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केली. सध्याच्या राजकीय घडामोडीकडे आपण कसे पाहता या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिभाताईंनी ही प्रतिक्रिया दिली.

कोल्हापूरच्या खासगी दौऱ्यावरून पुण्याकडे येत असताना प्रतिभाताई पाटील काहीकाळ सातारच्या विश्रामगृहावर थांबल्या असता माध्यमांशी बोलत होत्या. सातारच्या भूमिबाबत बोलताना प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, “साताऱ्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभल्याने ऐतिहासिक महत्व आहेच. पण, स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असणारे मोठे स्वातंत्र्य सैनिकही येथे होऊन गेल्याने त्या दृष्टीनेही साताऱ्याला खूप महत्व आहे. नुकतेच छत्रपती उदयनराजे भोसले भेटून गेले अतिशय आनंद वाटला. येथीलच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, किसन वीर अशी दिग्गज मंडळी या भूमितील असल्याचा गुणगौरव पाटील यांनी केला.”

राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असल्यापासून अनेकदा कार्यक्रम, अधिवेशन आदी निमित्ताने सातारा जिल्ह्यााच्या दौऱ्यावर आले. राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याांचा दौरा केला आहे. महाराष्ट्राबद्दल नैसर्गिक ओढ असल्याने मी निवृत्तीनंतर दिल्लीला न राहता महाराष्ट्रातच स्थायीक झाले आहे. महाराष्ट्र खूप गोड आहे. त्यामुळे त्याचे आपणास आकर्षण आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात पूष्कळ बदल झालेत. औद्योगिक सुधारणा झाल्या आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वत्र डिजिटीलायझेशन झाले. ही चांगली गोष्ट असल्याचे समाधान प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.

“परवा मी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. काल अदमापूरला जाऊन बाळूमामांचे दर्शन घेतले. त्यावेळी आदमापूर येथे असे सांगण्यात आले की अमावस्येच्या दिवशी जवळ-जवळ एक लाख भक्तगण तेथे येतात त्यांच्या पाण्याची सोय इथे होत नाही. तरी ती व्हावी अशी मागणी तेथील लोकांनी आपल्याकडे केली. यावर मी आज तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आदमापूरात पाण्याची सोय करावी. पाण्याचे टँकर त्यादिवशी उपलब्ध करून देण्याबाबत सूचवले असता जिल्हाधिकाऱ्यांनी होकार दिल्याचे”, पाटील यांनी सांगितले.