परभणी : कृत्रिम रंग, रासायनिक खते, तसेच अनेक कीटकनाशकांचा मारा करून उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि पैसा मिळवणे हा जणू सध्याचा मंत्र झाल्याने अन्नातील पोषणमूल्ये हरवली आहे. आपल्याला जर पोषणमूल्य असलेले अन्न, भाजीपाला हवा असेल, तर परंपरागत, नैसर्गिक व शाश्वत शेतीकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी शेतकरी आणि ग्राहकांची देशव्यापी चळवळ उभारावी लागेल, असे मत सेंद्रिय शेती या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांनी येथे व्यक्त केले.
येथील सरदेशपांडे ॲग्रो नर्सरी येथे नुकत्याच आयोजित केलेल्या ‘ऑरगॅनिक फ्युचर्स’ या कार्यशाळेत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केले. या कार्यशाळेत पुण्यातील अभिनव शेतकरी गटाचे संस्थापक आणि कृषिभूषण ज्ञानेश्वर बोडके, क्रोएशिया येथील फिटोस्मार्ट या कंपनीचे संस्थापक आणि सेंद्रिय शेतीमधील जागतिक तज्ज्ञ राॅबर्ट स्टेझायनर, सेंद्रिय गूळ या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मुंबई आयआयटीमधील प्रा. डाॅ. विशाल सरदेशपांडे सहभागी झाले होते. या कार्यशाळेत परभणीसह नांदेड, अहिल्यानगर, हिंगोली, वसमत येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी, अभ्यासक, व्यावसायिक सहभागी झाले होते. या वेळी या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यशाळेचे आयोजन ‘सरदेशपांडे ॲग्रो सर्व्हिसेस’चे सचिन सरदेशपांडे यांनी केले होते.
ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, ‘कीटकनाशके, कृत्रिम रंग, रासायनिक खतांच्या मागे लागल्याने आपण पारंपरिक नैसर्गिक शेती विसरत चाललो आहोत. ‘जंक फूड’ने आपण अनेक आजारांना आपलेसे केले आहे. साखर ही शरीरास अतिशय घातक असून, असंख्य भारतीयांना मधुमेह या आजाराने ग्रासले आहे. विषमुक्त अन्न, भाजीपाला तयार करण्यासाठी शेतकरीवर्गाने प्रामाणिक प्रयत्न करावेत. ग्राहक हाच आपला राजा आहे. त्याला सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवे. शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतानाच मार्केटिंग, आधुनिक तंत्रज्ञान, पॅकेजिंग या नवीन गोष्टींचा स्वीकार करावा. जसा प्रत्येक कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर असतो, तसेच प्रत्येक कुटुंबाचा फॅमिली शेतकरी असायला हवा. पुरुषांनी शेती करावी आणि महिलांनी विक्री व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे.
रसायनयुक्त खते, कीटकनाशके याच्या प्रचंड वापरामुळे नैसर्गिक शेती नष्ट होऊ लागली आहे. ही एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे. यातून वेळीच बाहेर पडण्यासाठी शाश्वत अशा सेंद्रिय शेतीची कास धरायला हवी, असे सांगून राॅबर्ट स्टेझायनर म्हणाले, ‘बाजारात अनेक गोष्टी विकल्या जातात त्या घेताना त्या पदार्थामध्ये कोणते अन्नघटक आहेत ते बारकाईने पाहावे.’
प्रा. सरदेशपांडे म्हणाले, ‘परदेशात, तसेच भारतात सध्या लोकांमध्ये स्थूलपणा वाढलेला दिसतो. त्यामुळेच वजन कमी करण्यावर भर दिला जातो. आपण रंग, चमक, वास असणाऱ्या जंक फूडला आणि त्याच्या जाहिरातींना भुलतो. या पदार्थातून आपल्याला तात्पुरती ऊर्जा मिळते, मात्र दीर्घकाळाचे नुकसान होते. भविष्यकाळाचा विचार करून शेतकरीवर्गाने नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळण्याची आज नितांत आवश्यकता आहे. यासाठी एक चळवळ उभी करायला हवी, असेही प्रा. सरदेशपांडे यांनी सांगितले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रसाद घारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रगतिशील शेतकरी प्रकाश हरकळ, साबळे, रमेश गोळेगावकर, प्रताप काळे, संभाजी शिराळे डॉ. सुरेश खापरे, प्रा. गणेश आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.