बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल वरचेवर काहीनाकाही चर्चा होत असते. या दोघांमध्ये आलबेल नसल्याचेही ब-याचदा म्हटले जाते. गेल्या वर्षी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ऐश्वर्या आणि रणबीरमधील काही दृश्यांवर अभिषेक आणि त्याचे कुटुंब नाराज असल्याची चर्चा होती. पण, या जोडप्याने तेव्हा अशा सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण, आता या दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या वादाचे कारण दुसरं तिसरं कोणी नसून त्यांची मुलगी आराध्या असल्याचे कळते.

काही संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बच्चन जोडप्यामध्ये सध्या सर्व काही ठीक नाहीये. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या करियरवरून या दोघांमध्ये वाद झाल्याचे कळते. आराध्याने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करावे अशी अभिषेकची इच्छा आहे. अभिनय क्षेत्रात तिने यशस्वी अभिनेत्री बनावे असे अभिषेकचे स्वप्न आहे. पण, आराध्याविषयी ऐश्वर्याचा विचार काही वेगळाच आहे. आपल्या लेकीने सध्या तरी लाइमलाइटपासून दूर राहणेच योग्य आहे, असे ऐश्वर्याला वाटते. याच कारणावरून या पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे म्हटले जातेय. मात्र, याबाबत बच्चन कुटुंबाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर लगेच काही बोलणे चुकीचे ठरेल.

दरम्यान एका मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, लवकरच ऐश्वर्या आणि अभिषेक दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या आगामी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. स्टारडस्ट मासिकाच्या वृत्तानुसार, दोघांनाही चित्रपटाची संहिता आवडली आहे, पण त्यांनी या चित्रपटासाठी अद्याप होकार दिलेला नाही. हा एक विनोदीपट असून यात प्रेमकथाही असणार आहे. या चित्रपटाला एक नवीन दिग्दर्शक दिग्दर्शित करणार असून, अनुराग कश्यप या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अमिताभ बच्चन यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते असे बोलले जात आहे. आतापर्यंत अभी आणि अॅशने ‘कुछ ना कहो’, ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘गुरु’, ‘उमराव जान’ आणि ‘सरकार राज’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘गुलाबजामुन’ असे ठेवण्यात येणार असल्याचे समजते.