काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी त्यांचा ६३ वा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात चेन्नईमध्ये साजरा केला. या पार्टीला बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. पण त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती या पार्टीला हजर नव्हती. त्यामुळे बोनीचे अनिल आणि संजयसोबतच्या नात्यात काही दुरावा तर आला नाही ना हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. एकीकडे बोनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला कोणी नव्हते तर दुसरीकडे संजय आणि अनिल यांनी दिलेल्या दिवाळी पार्टीत बोनी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. पण अर्जुन आणि अन्शुला ही दोन्ही मुलं संजय आणि अनिल काकांकडे वारंवार दिसतात.

कपूर यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ‘बोनी यांचे त्यांच्या दोन्ही भावांशी असलेले नात जवळपास संपत आले आहे. बोनी यांची पहिली पत्नी मोना यांच्या मृत्यूनंतर तर त्यांच्या नात्यात अजून दरी निर्माण झाली. संपूर्ण कपूर कुटुंबाचा मोनावर फार जीव होता. पण तिच्या मृत्यूनंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या. आता बोनीही फारसा संजय आणि अनिलच्या घरी येत नाही आणि ते दोघंही त्याच्याकडे जात नाहीत. राहत राहिला अर्जुन आणि अन्शुलाचा प्रश्न तर त्यांनी फार आधीच बोनी यांच्या दुसऱ्या कुटुंबासोबत न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते आपल्या काकांसोबत राहणंच पसंत करतात.’

सध्या बोनी यांना श्रीदेवीच्या घरच्यांचा पाठिंबा मिळत आहे. बोनी यांच्या वाढदिवसाला श्रीदेवी यांची बहिण श्रीलथा आणि तिचा नवरा उपस्थित होता. श्रीदेवी आणि श्रीलथा यांच्यातले वाद मिटवण्यात बोनी यांचा फार मोठा हात आहे. पण तेच बोनी आज स्वतःच्या सख्या भावांपासून दूर गेले आहेत. बोनी यांनीच अनिल आणि संजय यांचे करिअर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.