सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी विविध पोस्ट लिहित असतात. कधी सुविचार, कधी कविता असं विविध माध्यमांमधून ते त्यांचे विचार व्यक्त करत असतात. त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमधून चाहत्यांना मार्मिक सल्ला दिला आहे. अंहकारामुळे कोणकोणत्या गोष्टींचं नुकसान होतं हे त्यांनी सांगितलं आहे.

“अहंकारामध्ये धन, संपत्ती आणि वंश या सगळ्याचा नाश होतो. खरं वाटत नसेल तर रावण, कौरव आणि कंस यांच्याकडे पाहा”, असं ट्विट बिग बींनी केलं आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या बिग बीं नानावटी रुग्णालयात असून त्यांच्यावर करोनावरील उपचार सुरु आहेत.


दरम्यान, अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, आराध्या बच्चन यांनीही करोनाची लागण झाली असून सध्या या सगळ्यांवर उपचार सुरु आहेत. या काळात बिग बीं ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना देत आहेत.