हृतिकच्या फ्लर्टला कंटाळून अभिनेत्री दिशा पटानीनं चित्रपट सोडला अशा चर्चा बॉलिवूडमध्ये वाऱ्याच्या वेगानं पसरल्या. मात्र या चर्चा ऐकताच हृतिकनं माध्यमांवर आगपाखड केली आहे. या केवळ अफवा असून काही हिंदी दैनिकांनी स्वत:च्या फायद्यासाठी अशा बातम्या पेरल्याचा आरोप हृतिकनं केला आहे. तर दुसरीकडे दिशानंही हृतिकची पाठराखण केली आहे.

हृतिक आणि माझ्यात कोणताही वाद नाही या केवळ अफवा आहेत. हृतिकला मी फार कमी वेळा भेटले आहे आणि तो एका प्रतिष्ठित व्यक्तीपैकी एक आहे. मला हृतिकसोबत कोणत्याही चित्रपटाची ऑफर आली नव्हती, त्यामुळे ज्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत असं सांगत दिशानं हृतिकची पाठराखण केली आहे. तर दुसरीकडे हृतिकनंही काही हिंदी माध्यमांची कानउडणी केली आहे. केवळ टीआरपीसाठी माझा वापर केला जात असल्याचा आरोप त्यानं केला आहे.

हृतिकनं दिशासोबत वारंवार फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि यालाच कंटाळून दिशानं चित्रपट सोडला अशा चर्चा  कालपर्यंत होत्या. मात्र दिशाला हृतिकसोबत कोणत्याही चित्रपटाची ऑफर आली नव्हती असं तिच्या जवळच्या व्यक्तीनं स्पष्ट करत या चर्चा मोडून काढल्या होत्या.