‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाने कमी दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. कॉमेडियन कपिल शर्माच्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना तास- दीड तास एकाच जागी खिळवून ठेवण्याची किमया केली होती. पण, काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाला गालबोट लागल्याप्रमाणे सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात वाद झाला. या वादानंतर सुनीलने कपिलचा शो सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम कार्यक्रमाच्या टीआरपीवरही झाला. इतकंच काय तर हा कार्यक्रम बंद होण्याच्याही चर्चा रंगल्या. पण, तसं काहीच होणार नाहीये. उलट सोनी वाहिनीने या कार्यक्रमाचा पूर्णपणे कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘द कपिल शर्मा शो’ आता अगदी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे या कार्यक्रमात काही मोठे बदल करण्यात येणार असून, टीआरपीच्या शर्यतीत हा शो पुन्हा बाजी मारतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे निर्माते काही महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत असून त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. पण, ते नेमके कोणते बदल असणार आहे हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.

वाचा : ….म्हणून अक्षयने तिचं कधीच ऐकलं नाही

दरम्यान, याविषयीच्याच चर्चा रंगत असताना सोनी वाहिनीशी निगडीत एका सूत्राने सांगितले की, ‘हा कार्यक्रम बंद होणार नाहीये, पण त्यात काही बदल झाल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात येईल. कार्यक्रमाचा घरसलेला टीआरपी परत मिळवण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.’ कपिल शर्माच्या या विनोदी कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटींचा वावरही कमी होणार असल्याचं म्हटलं जात असून, आता त्याच्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अफलातून पात्रांमध्ये काही बदल होतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’ची लोकप्रियता परत मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या टीमला आता सुनील ग्रोवरची साथ मिळणार का, याकडेही अनेकांचच लक्ष लागलं आहे.