अभिनेत्री सायराबानो यांनी आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर समीर भोजवानी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. सायरा बानो यांच्या तक्रारीनुसार समीर भोजवानी गेली अनेक वर्षे दिलीप कुमार यांना धमक्या देतोय. वांद्र्यांच्या पाली हिल भागातील बंगला बळकावण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे. बिल्डर समीरपासून संरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

रिपोर्ट्सनुसार, सायरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, समीर भोजवानी याने काही खोटी कागदपत्रं तयार केली आहेत. या कागदपत्रांच्या आधारेच तो दिलीप कुमार यांना धमकावत आहे. शिवाय समीरची राजकीय वर्तुळातही फार ओळख असल्याने तो आम्हाला सतत धमकावत असल्याचे सायरा यांनी पत्रात नमूद केले.

पाली हिल येथील दिलीप कुमार यांचा बंगला डेव्हलप करण्यासाठी त्यांनी २००६ मध्ये प्रजिता डेव्हलपर्ससोबत करार केला होता. पण २००८ पर्यंत त्यांनी कोणतेही बांधकाम सुरू न केल्यामुळे दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी तो करार रद्द करुन संपत्ती परत त्यांना देण्याची मागणी केली. हे सर्व प्रकरण कोर्टात गेले. ११ वर्ष चाललेल्या या खटल्याचा सप्टेंबरमध्ये दिलीप कुमार यांच्या बाजूने निर्णय लागला.