सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना आहे. परंतु आजच्या काळात सौंदर्याची व्याख्या जरा बदलेली दिसते. म्हणतात ना ‘क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप’ अगदी तसंच काहीसं! जोडीदाराच्या बाबतीत अनेकांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. अशाच एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मांडण्यात येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने केली आहे. या मालिकेत अक्षया नाईक लतिकाची भूमिका आणि समीर परांजपे अभिमन्यूची भूमिका साकारणार आहेत. येत्या ३१ ऑगस्टपासून पासून सोमवार ते शनिवार रात्री ९.०० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. याच दिवसापासून 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लतिका उत्तम विनोदबुध्दी असलेली, खेळकर स्वभावाची, शाळेपासून अभ्यासात प्रचंड हुशार, उत्तम स्वयंपाक करणारी मुलगी आहे. इतकं सगळं असून देखील निव्वळ शरीराने लठ्ठ असल्याने लहानपणापासून तिला टोमणे ऐकावे लागतात. याच एकमेव कारणामुळे तिचे लग्नदेखील अद्याप जमले नाही. ३४ स्थळांकडून आजवर तिला नकार आला आहे. सगळ्यांना आनंदी ठेवणारी, सुख - दु:खात साथ देणार्या लतिकाने या गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि याचा तिला फारसा फरकही पडत नाही. याउलट दिसायला देखणा, अंगापिडानं मजबूत, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा अभिमन्यू आहे. स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला 'फिट' करायचं आहे, म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे. अभिमन्यूचं स्वप्न आणि लतिकाचं लग्न यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ?त्यांची मनं कशी जुळतील ? हा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मनवा नाईक या मालिकेची निर्माती असून याबाबत ती म्हणाली, "लॉकडाउनमुळे आलेली मरगळ दूर करण्याची संधी आम्हाला या’सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे मिळाली आहे. मालिकेचा विषय खूप वेगळा आहे आणि त्याला आम्ही अतिशय साध्या सोप्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मालिकेचे संपूर्ण शूटिंग नाशिकला होणार आहे. इकडची भाषा, त्यांची बोलण्याची पध्दत, हिरवगार शेत आणि विविध पदार्थांची रेलचेल यासगळ्यासोबत शूटिंगची देखील मजा घेतली जाते आहे.”