चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीला मोठ्याप्रमाणावर मोबदला देण्यात येत असल्या कारणाने करारामध्ये अभिनेत्रीसाठी ‘नॉन-प्रेगनन्सी’ची अट असवी यासाठी अभिनेत्री आणि निर्माती शिल्पा शेट्टीने सहमती दर्शवली आहे. अभिनेत्री विद्या बालन गर्भवती असल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमिवर शिल्पाने हे मत व्यक्त केले आहे. करारातील या अटीमुळे अभिनेत्रीला तिने स्विकारलेला चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना गर्भवती राहाता येणार नाही. शिल्पा शेट्टीच्या निर्मितीसंस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘ढिश्क्यांव’ या चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात वार्ताहरांशी बोलताना शिल्पा म्हणाली, दिग्दर्शक आणि निर्माता ‘नॉन-प्रेगनन्सी’च्या अटीबाबत निर्णय घेऊ शकतात… यात काहीही चुकीचे नाही. चित्रपट पुर्ण होण्यास सर्वसाधारणपणे एक वर्षाचा कालावधी लागत असल्याने अशी अट असणे योग्य आहे, परंतु चार किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचा काळ लागत असल्यास हे योग्य ठरणार नाही. कलाकारांनी हे समजणे गरजेचे आहे की त्यांच्यावर खूप मोठ्याप्रमाणावर पैशाची गुंतवणूक करण्यात आलेली असते आणि त्यांनी जबाबदारीने वागायला हवे. राज कुंद्रा या व्यावसायिकाशी लग्न झालेल्या शिल्पाचे म्हणणे आहे की, प्रेक्षक सर्व प्रकारच्या अभिनेत्रींचा स्विकार करत असल्याने कोणत्याही अभिनेत्रीसाठी लग्न हा अडथळा अथवा कारकीर्दीचा शेवट असू शकत नाही. प्रेक्षकांमुळे मी चित्रपटसृष्टीत आहे असे मानणारी शिल्पा पुढे म्हणाली, मी त्यांचे (प्रेक्षकांचे) देणे लागते, जे आता परत करण्याची वेळ आली आहे. यासाठीच आम्ही ‘ढिश्क्यांव’ या मनोरंजनात्मक चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील संवादांविषयी बोलताना शिल्पा म्हणाली, या चित्रपटात काही दमदार संवाद आहेत, जे अलिकडच्या काळातील चित्रपटातून दिसेनासे झाले आहेत. चित्रपटात काही दमदार संवाद आहेत, जे प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. गेल्या काही काळापासून आपल्या चित्रपटातून ‘डायलॉगबाजी’ नाहीशी होत चाललेल आहे, आधीच्या चित्रपटांचा तो अविभाज्य भाग होता. मला ‘डायलॉगबाजी’ खूप आवडते, आमच्या चित्रपटात दमदार संवाद असतील याची आम्ही काळीजी घेतली आहे.
सनी देओल, हरमन बावेजा, आदित्य पांचोली आणि आयेशा खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ढिश्क्यांव’ हा चित्रपट २८ मार्च रोजी चित्रपटगृहात झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.