नव्वदचे दशक गाजवणारा सुपरहिट चित्रपट म्हणजे 'मिस्टर इंडिया'. या चित्रपटामध्ये अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुख्य भूमिका होती. प्रेक्षकांच्या मनावर मोहर उमटविणाऱ्या या चित्रपटाचा लवकरच रिमेक येणार असल्याची कलाविश्वात चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'मिस्टर इंडिया'ला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. एकीकडे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे मात्र अभिनेत्री सोनम कपूर नाराज असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाचा रिमेक येणार असल्याची माहिती सोनमला मिळताच तिने ट्विरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणार असल्याची चर्चा रंगत असतानाच त्याबाबत एक नवीन सत्य समोर येत आहे. 'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणार असल्याची माहिती चित्रपटातील मुख्य कलाकारांनाच माहितच नसल्याचं सोनमने सांगितलं आहे. काही दिवसापूर्वी चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करुन 'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणार असल्याची माहिती दिली होती. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर सोनमने ट्विट करत नाराजी व्यक्त केली. "गेल्या काही दिवसापासून मला अनेक जणांनी 'मिस्टर इंडिया'च्या रिमेकबाबत विचारलं. मात्र खरं सांगायचं झालं तर मला या रिमेकविषयी काहीच कल्पना नाही. इतकंच कशाला माझ्या वडिलांनाही याबाबत काहीच माहिती नाही. ज्यावेळी अली अब्बास यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली तेव्हा आम्हाला समजलं", असं सोनम म्हणाली. FYI pic.twitter.com/YRmrny8VeW — Sonam K Ahuja (@sonamakapoor) February 22, 2020 पुढे ती म्हणते, "ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवल्यामुळे आम्हाला वाईट वाटलं. कारण या चित्रपटामध्ये माझे वडील आणि शेखर काका या दोघांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे निदान त्यांना तरी रिमेकची कल्पना द्यायला हवी होती. या दोघांना ही माहिती नसणं हे अत्यंत अनादरयुक्त आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचा अगदीच जवळचा आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने आणि मनापासून तो तयार केला होता". Excited to partner with @ZeeStudios_ for an epic trilogy #MrIndia! It is a huge responsibility to carry forward an iconic character loved by everyone. Currently, working on the script, no actor has been locked till now. Once we lock the first draft of the script, casting begins! — ali abbas zafar (@aliabbaszafar) February 17, 2020 दरम्यान, दिग्दर्शक अली अब्बास यांनी ट्विटवर 'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणार असल्याची माहिती दिल्यापासून कलाविश्वामध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या रिमेकमध्ये अनिल कपूर यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार असून मोगॅम्बोच्या भूमिकेत शाहरुख खान झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.