‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला, पण काही दिवसांपुर्वी अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. तेव्हापासून या चित्रपटाबद्दलच्या अनेक चर्चा सुरू आहेत. आता हे प्रकरण चित्रपटाच्या कॉपीराईट्सवर येऊन थांबलं आहे. परेश रावल यांच्या बाहेर पडल्याच्या घोषणेनंतर निर्माता, अक्षय कुमारकडून परेश यांना नोटीस पाठवण्यात आली होती.

परेश रावल यांच्या वकिलांनी या नोटीसला उत्तर देत नमूद केले होते की, चित्रपटाचे कॉपीराईट्स फिरोज नाडियाडवाला यांच्याकडे आहेत आणि त्यांनी परेशसह इतर कलाकारांनी चित्रपटासंबंधित काहीही कृती न करण्याची नोटीस पाठवली होती. तसंच परेश यांच्या वकिलांनीही त्यांचं चित्रपटामधून बाहेर पडण्याचं हेच कारण असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता या कॉपीराईट्स प्रकरणी दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियदर्शन यांनी ‘मिड-डे’शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले आहे की, अशा आरोपांमुळे ते ‘नाराज’ आहे. त्यांनी फिरोज नाडियाडवाला हे ‘हेरा फेरी’च्या फ्रँचायझीचे आयपीआर (बौद्धिक संपदा हक्क)चे मालक आहेत या वृत्तांचं खंडन केलं. याबद्दल ते म्हणाले, “अक्षयने ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीचे संपूर्ण हक्क फिरोज नाडियाडवाला यांच्याकडून १० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.”

यापुढे ते म्हणाले, “हे फक्त ‘हेरा फेरी ३’साठी नाही, तर संपूर्ण फ्रँचायझीसाठी आहेत. मला हे माहित आहे, कारण मी त्याचे कागदपत्र पाहिले आहेत. याबद्दलचे सगळे कागदपत्र अक्षयने मला दाखवली. ज्यात साजिद नाडियाडवालाचे हक्क असलेले कागदपत्रेदेखील आहेत. पेपर्स पाहिल्यानंतरच मी चित्रपट दिग्दर्शन करण्यास होकार दिला.” दरम्यान, परेश रावल यांच्या चित्रपटातून बाहेर पडण्याच्या घोषणेवर अक्षयनेही प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हाउसफुल्ल ५’च्या ट्रेलर लाँचवेळी अक्षयने याप्रकरणी असं म्हटलेलं की, “मी परेश रावल यांच्याबरोबर गेली ३२ वर्ष काम करत आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि ते खूप कमाल अभिनेते आहेत. मी त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकलो आहे. जे काही झालं आहे, त्याविषयी इथे बोलणं योग्य नाही. मी या मंचावर याविषयी बोलणार नाही. हा खूप गंभीर मुद्दा आहे. हे प्रकरण सध्या न्यायालय हाताळत आहे.”