बॉलीवूड अभिनेता इमरान खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. त्याने पत्नी अवंतिका मलिकपासून घटस्फोट घेत ८ वर्षांचा संसार मोडला. २०११ मध्ये इम्रान आणि अवंतिकाने लग्न केलं होतं. पण २०१९ मध्ये घटस्फोट घेत दोघे वेगळे झाले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे. इम्रान खानपासून विभक्त होण्याच्या संघर्षांबद्दल आणि आयुष्यातील या कठीण टप्प्याबद्दल अवंतिकाने नुकताच मोकळेपणाने संवाद साधला.
नयनदीप रक्षितच्या युट्यूब चॅनलवर अवंतिकाने इम्रानपासून विभक्त होण्याचा त्यांच्या मुलीवर झालेल्या परिणामाबद्दल सांगितलं. याबद्दल अवंतिका म्हणाली, “जेव्हा आम्ही पहिल्यांदा इमाराला सांगितले की, मी आणि इम्रान आता वेगळे होत आहोत; तेव्हा तिच्या मनात पहिला प्रश्न आला की, ती तिच्या पालकांना गमावणार आहे का. सुदैवाने, माझ्या कुटुंबात अशी उदाहरणे होती, ज्यामुळे तिला कळलं की, कोणीही त्या लोकांची जागा घेऊ शकत नाही.”
यापुढे अवंतिकाला तिने इमाराला इम्रानपासून दूर करण्याचा प्रयत्न केला का? असे विचारले असता, अवंतिका म्हणाली, “माझ्या लहानपणी माझ्या वडिलांशी फार चांगले संबंध नव्हते. त्यामुळे मी आधीपासूनच याबाबत स्पष्ट होते की, मला माझ्या मुलीबरोबर ते करायचं नाही. एखाद्या व्यक्तीवरच्या रागामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल मनात विष निर्माण करू शकत नाही. इमाराचे इम्रानशी खूप सुंदर नाते होते आणि मी ते खराब केलं तर तिला त्रास होणार.”
तसंच पुढे अवंतिका असं म्हणाली, “घटस्फोटानंतर मुलीबरोबर घराबाहेर पडणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मला सहन करावे लागलेले ते सर्वात वाईट क्षण होते. पण याबद्दल मी खूप भाग्यवान आहे की, माझ्या अवतीभवती इतके लोक होते. माझे मित्र आणि माझ्या कुटुंबाने मला सांभाळलं आणि मला माझ्या या कठीण काळात खूप उत्तम साथ दिली.”
दरम्यान, इम्रान खान ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटानंतर लोकप्रिय ठरला होता. यानंतर त्याने ‘किडनॅप’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘देल्ली बेल्ली’, मेरे ब्रदर कि दुल्हन’, ‘कट्टी बट्टी’ अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.